उमाकांत देशपांडे

 ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करणाऱ्या आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे राज्याच्या राजकारणात अधिक रस असणाऱ्या पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नव्हत्या. पण पक्षाने केंद्रीय राजकारणात अलगदपणे ढकलल्याने पंकजा यांचा आता नाईलाज झाला आहे. यातूनच ‘मला लोकसभा निवडणूक लढायची नव्हती. पण मला राज्याने नाही, तर देशाने उमेदवारी दिली’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे प्रदेश भाजपा नेत्यांना सूचक इशारे दिले आहेत.

भाजपने अजित पवार गटाशी हातमिळवणी केली आणि धनंजय मुंडे आपोआपच युतीत दाखल झाले. परिणामी विधानसभेसाठी परळीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता दुरावली होती. त्याबद्दलही पंकजा यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. यामुळेच लोकसभेची उमेदवारी स्वीकारण्याशिवाय त्यांच्यापुढे काहीच पर्याय नव्हता.

पंकजा मुंडे यांना २०१४ च्या निवडणुकीत जिंकून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,’ यासह त्यांनी केलेली अनेक विधाने त्यांना राजकीयदृष्टय़ा महागात पडली.  गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने पंकजा मुंडे यांची राजकीयदृष्टय़ा पिछेहाट झाली. पक्षांतर्गत राजकारणातून पराभव झाल्याचे शल्य त्यांच्या मनात होते व त्यांनी ते अनेकदा बोलून दाखविले. गेल्या साडेचार वर्षांत त्यांना विधानपरिषद किंवा राज्यसभेची उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांनी व समर्थकांनी अनेकदा नाराजी प्रकट केली व गेल्या वर्षी त्या दोन महिने सुटीवरही निघून गेल्या होत्या. पंकजा मुंडे यांना डिवचण्यासाठीच वंजारी समाजातील अन्य नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देण्यात आली. यापैकी डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली.

 मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या एकनाथ खडसे यांना पक्षाबाहेर जावे लागले. विनोद तावडे यांना विधानसभेत उमेदवारीच नाकारण्यात आली पण कालांतराने ते राष्ट्रीय राजकारणात स्थिरावले. सुधीर मुनगंटीवर आणि पंकजा मुंडे यांना आता राष्ट्रीय राजकारात आपली छाप पाडावी लागेल.

पक्षाने केंद्रीय राजकारणात अलगदपणे ढकलल्याने पंकजा यांचा आता नाईलाज झाला आहे. यातूनच ‘मला लोकसभा निवडणूक लढायची नव्हती. पण मला राज्याने नाही, तर देशाने उमेदवारी दिली’ असे  पंकजा म्हणाल्या.