दिगंबर शिंदे

सांगली : राज्यात सत्तांतरानंतर मंत्रीमंडळ विस्तारात खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांना संधी मिळेल अशी आशा निर्माण करून विटा नगरपालिकेवर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत. अन्य नगरपालिकेप्रमाणे विटा नगरपालिकेचीही निवडणुक लांबणीवर पडली असली तरी नजीकच्या काळात निवडणूक होईल या आशेवर राजकीय मोर्चेबांधणी सध्या सुरू असून या निमित्ताने बाबर व पाटील यांच्यात निवडणुक पुर्व खडाखडी सध्या सुरू आहे.

गेल्या आठवड्याच्या अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विट्यात महाआरोग्य शिबीराचे आयोजन बाबर गटाने केले होते. सर्वसामान्यांच्या दृष्टीने आरोग्य शिबीर हवेच होते, यात शंकाच नाही. मात्र, नगरपालिका हद्दीमध्ये हे शिबीर घेण्यामागील राजकीय हेतू लपून राहिला नाही. या निमित्ताने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत देत असतानाच या निमित्ताने विटेकरांना आनंदाची वार्ता मिळेल असेही सूतोवाच करीत आ. बाबर यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाचे संकेत दिले. यातून विटा नगरपालिका निवडणुकीत बाबर गटाला ताकद देण्याचा आणि राज्यातील सत्तेचा फायदा होउ शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा.

हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक समाजाच्या चेहऱ्याच्या शोधात

बाळासाहेबांची शिवसेना हा पक्षाचे दिसण्यासारखे अस्तित्व केवळ याच मतदार संघामध्ये आहे याला कारण आहे ते केवळ आ. बाबर गटाचे असलेले ग्रामीण भागातील वर्चस्व हे मान्यच करावे लागेल. मात्र, गेल्या तीन पिढ्या विटा शहरावर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाचेच वर्चस्व राहिले आहे. ग्रामीण भाग आ. बाबर यंाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, मात्र, शहरी भागाने अद्याप बाबर गटाला नगरपालिकेतील सत्तेपासून रोखले आहे. या निमित्ताने टेंभू योजनेच्या पाण्याचे आणि नियोजनाचे राजकारण करून ग्रामीण भागातील बाबर गटाचा पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाटील गटाकडून सुरू असतानाच याला शह देण्यासाठी बाबर गटानेही विटा शहरात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करून बस्तान बसविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा… मराठवाड्यात अजित पवार यांची नव्याने बांधणी

सध्या शहरात पाटील गटाचे नेतृत्व वैभव पाटील यांच्याकडे आहे, तर बाबर गटाचे शहरातील नेतृत्व आमदार पुत्र अमोल बाबर यांच्याकडे ग्रामीण भागातील नेतृत्व सुहास बाबर यांच्याकडे आहे. दोन्ही आमदार पुत्रांनी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात महत्वाची भूमिका बजावून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. आता ताकद किती वाढली, राजकीय परिणाम काय होणार याची उत्तरे मिळण्यासाठी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची प्रतिक्षा करावी लागणार असली तरी आ. बाबर यांची होत असलेली राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून झाला.

हेही वाचा… Maharashtra Politics News Live : विधानसभा अध्यक्ष कायम त्यांच्या राजकीय पक्षाला प्राधन्य देतात – कपिल सिब्बल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आ. बाबर यांना बाळासाहेबांची शिवसेना यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपमधूनच शह देण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहे. यामध्ये भाजपचे स्टार प्रचारक आ. गोपीचंद पडळकर हे आघाडीवर असून त्यांना आटपाडीच्या देशमुख वाड्यावरून कुमक व प्रतिसाद मिळत आहे. इकडे तासगावमधून विसापूर मंडळातील गावामधूनही भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचा गट अधूनमधून बाबर यांना शह देण्याचा प्रयत्न करीत असतोच. या राजकीय कोंडीतून बाहेर पडून आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी बाबर गटाला अशा लोकोत्सवी कार्यक्रमाची सातत्याने गरज भासणारच आहे.