गेल्या वर्षी बांगलादेशात हिंसक निदर्शने झाली. या निदर्शनानंतर बांगलादेशात सत्तांतर झाले. शेख हसिना यांनी देशातून पलायन केल्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीचे नाव भारताच्या मतदार यादीत आढळून आल्याने राजकारण तापले आहे. न्यूटन दास असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

या छायाचित्रांमध्ये तो २०२४ च्या बांगलादेशातील निदर्शनांमध्ये सहभागी असल्याचे दिसून येत आहे. सरकारी नोकऱ्यांसाठीच्या वादग्रस्त कोटा प्रणालीमुळे ही निदर्शने सुरू झाली होती. परंतु, न्यूटन दास याने आपण भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्याने पॅन कार्ड आणि आधार कार्डसह काही कागदपत्रे दाखवली. परंतु, तो भारतात राहतो की बांगलादेशात याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलेले नाही. हे नेमके प्रकरण काय? त्यावरून राजकारण का तापले? भाजपाने कोणते गंभीर आरोप केले? त्याविषयी जाणून घेऊयात.

न्यूटन दास याने आपण भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

न्यूटन दासचे म्हणणे काय?

न्यूटन दासने वृत्तसंस्था ‘पीटीआय’ने जारी केलेल्या एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे, “मी २०२४ मध्ये आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही समस्यांसाठी बांगलादेशला गेलो होतो. पण, तिथल्या निदर्शनांमध्ये मी अचानक अडकलो. मी २०१४ पासून काकद्वीपमधील मतदार आहे.” त्याने पुढे सांगितले, “२०१७ मध्ये माझे मतदार कार्ड हरवले असले तरी स्थानिक आमदार मंटुराम पाखीरा यांच्या मदतीने मी पुढच्या वर्षी नवीन कार्ड प्राप्त केले. २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही मी मतदान केले.”

परंतु, न्यूटनचा चुलत भाऊ तपन याने परस्परविरोधी विधान केले. तो म्हणाला की, न्यूटनचा जन्म बांगलादेशात झाला आणि तो दोन्ही देशांमध्ये मतदान करतो. तो कोविड महामारीनंतर काही वडिलोपार्जित जमीन विकण्यासाठी भारतात आला आणि तेव्हापासून तो भारतातच आहे. दोन्ही ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे, कारण हे योग्य नाही, असे तपन याने पत्रकारांना सांगितले.

भाजपाचे गंभीर आरोप

  • भारतीय जनता पार्टी (भाजपा)ने हा विषय ताणून धरला असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) ताशेरे ओढले आहेत.
  • भाजपाने निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी बेकायदा स्थलांतराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे.
  • “ही तृणमूल काँग्रेसची योजना आहे. बंगालच्या मतदार यादीत बेकायदा घुसखोरांचा समावेश करा आणि खोट्या मतांनी निवडणुका सुरक्षित करा,” असे पश्चिम बंगाल भाजपाने म्हटले आहे.
  • केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुकांता मजुमदार म्हणाले, “‘एगिए बांगला मॉडेल’चे आणखी एक ज्वलंत उदाहरण! बांगलादेशच्या कोटा सुधारणा निदर्शनादरम्यान काठी घेऊन दिसलेला न्यूटन आता पश्चिम बंगालच्या काकद्वीपमध्ये नोंदणीकृत मतदार आहे.”
  • “ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बंगालमध्ये हजारो बांगलादेशी न्यूटन मतदान करत आहेत. बेकायदा मतदार आणि हे लाठीमार करणारे गुंड त्यांच्या समर्थनाचा आधार आहेत. त्या ग्रेटर बांगलादेशसाठी ब्लूप्रिंट तयार करत आहेत,” असेही ते म्हणाले.
  • पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनीदेखील पश्चिम बंगालच्या मतदार यादीत लाखो बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याचे म्हटले.
  • भाजपा मथुरापूर संघटन जिल्हा सचिव संजय दास यांनी आरोप केला, “तृणमूल काँग्रेस बांगलादेशी घुसखोरांना भारतात प्रवेश करण्यास मदत करत आहे.”

तृणमूल काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

तृणमूल काँग्रेसने भाजपाचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी केंद्र व भारत-बांगलादेश सीमेचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) या परिस्थितीसाठी जबाबदार धरले. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “आमचे राज्य सरकार आपले काम करेल, परंतु सुरक्षा सुनिश्चित करणे केंद्र सरकारचे काम आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीएमसीच्या सुंदरबन संघटनात्मक जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देबाशिष दास हे न्यूटन दास याच्याबरोबरच्या एका फोटोमध्ये केक कापताना दिसले. ते म्हणाले, बांगलादेशच्या निदर्शनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची त्यांना कल्पना नव्हती. व्हायरल झालेला फोटो वाढदिवसाच्या समारंभात काढण्यात आला होता आणि त्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते. जर त्याच्यासारखा कोणता व्यक्ती सीमा ओलांडण्यात यशस्वी झाला असेल तर ते बीएसएफ आपले काम योग्यरित्या करत नसल्याचे हे चिन्ह आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.