मुंबई: तांत्रिकदृष्ट्या सदोष असणारे वाहन चालवून प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपांवर इंधन बंदी करण्यात येणार आहे. लवकरच यासंर्दभातील धोरण निश्चित करुन शासन आदेश काढला जाईल अशी महिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अनेक वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
मोटार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी परिवहन व प्रदूषण विषयक काही सूचना केल्या. राज्यातील शहरी भागात दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. पारंपारिक पेट्रोल व डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला बंधनकारक केले आहे. ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने मिळवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
काही प्रमाणपत्र बोगस असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने वायू प्रदूषणा मध्ये वाढ झाली असल्याचा अहवाल आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगाने घसरत आहे. या प्रदूषणाला बऱ्याच अंशी तांत्रिक दृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते.
भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणारा आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशकां नुसार तपासणी केली जाईल. वाहनचालकाकडे योग्य प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल. अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आखण्यात येत आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते.