रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाने लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छूकांनी पुन्हा चाचपणी सुरू केली आहे. प्रभागांची रचना कशी होते यावर सारे अवलंबून असेल. दुसरीकडे, ग्रामपंचायत निवडणुकीकरिता आरक्षण जाहीर झाल्याने काही जणांनी निराशा झाली आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका येत्या चार महीन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. गावा गावात नव्याने नेतृत्व उभे राहण्यासाठी इच्छुकांनी मैदानात उतरायला सुरुवात केली आहे. सरपंच आरक्षण जाहीर झाल्यामुळे गावागावांत हौसे, नवसे, गौसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार झाले आहेत. काही ठिकाणी पडलेल्या महिला आरक्षणामुळे नावाजलेल्या पुढाऱ्यांची आतापासूनच कमालीची डोकेदुखी वाढली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने इच्छूकांनी चाचपणीस सुरुवात केली आहे.

महिला व पुरुष इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच गावातील जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची सर्वांत महत्त्वाची यंत्रणा असून, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे सरपंच पदावर येणाऱ्या व्यक्तीला मोठे अधिकार मिळालेले असतात. या अधिकाराच्या जोरावर आपले राजकीय वर्चस्व आणि दबदबा कायम ठेवण्यासाठी गावच्या पुढा-यांकडून प्रयत्न केला जात आहे.

जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महिला आरक्षणानुसार ब-यास ठिकाणच्या भागात महिलांची सत्ता स्थापन होणार असल्याने या आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी करण्याची सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबर स्थानिक आघाड्यांनी देखील आपली कंबर कसली आहे. मात्र या महिला आरक्षणामुळे काही पुढा-याचा पत्ता कट झाल्याने याना आता पुढील पाच वर्षासाठी राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली आहे. तर या महिला आरक्षित जागेवर उमेदवार उभे करताना त्यांची जास्तच डोकेदुखी वाढली आहे. राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी गावचे पुढारी आता सरसावले असल्याने एकप्रकारे ‘स्थानिक स्वराज्य संस्था मिशन’ असा खेळ गाव पातळीवर सुरु झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणे अपेक्षित असताना महिला आरक्षणामुळे आमचे राजकीय अस्तित्व कमी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार शोधणे कसरतीचे काम आहे. किशोर सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य, नाचणे, रत्नागिरी