Priyanka Gandhi Raipur Chhattisgarh: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत असताना भाजपा सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या नाऱ्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत असलेली जवळीक पाहता हा नारा आता “मित्रांची साथ, मित्रांचा विकास” असा झाला असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच केंद्र सरकार न्यायालय, माध्यमं, ईडी आणि प्राप्तीकर विभागाला हाताशी धरून विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशीही टीका प्रियांका गांधी यांनी केली. हिंडेनबर्ग संशोधन संस्थेचा अहवाल प्रसारीत झाल्यापासून काँग्रेस पक्ष हा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात अदाणी समूहाने शेअर्सच्या किंमतीमध्ये फेरफार केल्याचे आरोप केले होते. या विषयावर काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनात बोलत असताना प्रियांका गांधी यांनी भाजपाचा समाचार घेतला.

युवक-शेतकरी त्रस्त, अदाणींची संपत्ती मात्र वाढत चालली

“आज कुणाला संधी मिळतेय? लहान-सहान उद्योगधंदे बंद पडले आहेत. शेतकरी प्रतिदिन केवळ २७ रुपये कमवतोय. तर दुसऱ्या बाजूला अदाणी १,६०० कोटी कमवत आहेत. देशातला युवक बेरोजगार आहे. सरकारशी संबंधित सर्व प्रकल्प अदाणी समूहाला देण्यात येत आहेत. मागच्या तीन वर्षांत एक लाख मजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचवेळी अदाणींच्या संपत्तीमध्ये १३ पटींनी वाढ झाली. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. युवक-शेतकरी अडचणीत सापडला असून आर्थिक अडचणींनी नागवला जात असताना अदाणींना मात्र बँका ८० हजार कोटींचे कर्ज देऊ करत आहेत. भाजपाची सर्व नेतेमंडळी अदाणींसाठी मैदानात उतरली आहेत. गरीबांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीच पुढं येत नाही. तुम्ही सरकारची संपत्ती गमावत आहात, पण सामान्यांसाठी काहीच करत नाहीत. त्यामुळे जनतेला आवाहन आहे की, त्यांनी वास्तव पाहावे. सत्तेत आल्यानंतर त्यांच्यासाठी कोण काम करतंय, याकडे लक्ष द्यावे.”, अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेजी झोड उठवली.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Dharamrao Baba Atram vijay wadettiwar
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”

संविधानासाठी एकत्र येऊन लढा द्यायला हवा

प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच छत्तीसगढला येत आहे. मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल यांनी मला अनेकदा आमंत्रित केले होते. छत्तीसगढच्या संस्कृती, परंपरा आणि नैसर्गिक सौंदर्याविषयी माझी आजी इंदिराजींकडून खूप ऐकले होते आज प्रत्यक्षात पाहताना मला आनंद वाटत आहे. मी शिरपूर येथे भेट दिली असताना शिवजींचे मंदिर आणि तेथील आदिवासी बांधवाची परंपरा आणि त्यांची एकजूट पाहिली. त्यांची संस्कृती धर्मनिरपेक्षतेशी आपली नाळ घट्ट धरून आहे. आपले संविधान देखील या तत्त्वावर विश्वास ठेवतं. आपण सर्वच वेगवेगळ्या स्तरातून येऊन भारताला एक महान राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आपलं संविधान काय आहे? तर विविधतेत एकतेचं प्रतिक. त्यामुळे आपण सर्वांनी संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊन लढा दिला पाहीजे.

“जर संविधान कमजोर झाले तर भाजपाच्या नेत्यांना भेदभाव आणि अन्याय करण्याची संधी मिळेल. संविधानाने आपल्या सर्वांना समानतेचा अधिकार दिला आहे. जर तुम्हाला आयुष्यात प्रगती साधायची असेल तर समान संधी मिळणे गरजेचं असतं. आपल्याला आपलं जीवन सन्मानानं जगता आलं पाहिजे, धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि आपली स्वतःच्या जीवनशैलीप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य देखील असलं पाहिजे.”, असंही त्या म्हणाल्या.

भाजपाकडून माध्यमं, विरोधक यांची गळचेपी

त्या पुढं म्हणाल्या, “आज देशात काय सुरु आहे हे समजून घ्या. भाजपा सरकार माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. माध्यमं त्यांचं काम करु शकत नाहीत. त्यांनी न्यायालयावर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संसदेत लोकप्रतिनिधींचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसचे सदस्य महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे भाषण रेकॉर्डवरुन हटविले जातं. ईडी आणि प्राप्तीकर विभागाने छत्तीसगढमध्ये छापे टाकले. मुख्यमंत्री भुपेश सिंह बघेल हे चांगलं काम करत आहेत. भाजपाकडून छत्तीसगढ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, पण लोकांना सरकारची कामं माहीत आहेत. आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. त्यांनी यंत्रणा पाठविल्या. आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. आम्हीच परत जिंकू हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांच्याकडून हे प्रकार सुरु आहेत. देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे सत्य कळले पाहीजे.”

निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे तुमच्यासमोर अनेक गोष्टी येतील. ते धर्म आणि समाजाबद्दल बोलतील. पण तुम्ही त्यांना तुमच्यासाठी काय काम केले? हा प्रश्न विचारा. कामाच्या आधारावरच मतदान करा. निसंशयपणे राज्य सरकार इथल्या जनतेसाठी काम करत आहे. इतर कोणत्याही राज्यापेक्षा छत्तीसगढ सरकारने खूप प्रभावी काम केले असल्याचेही प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, छत्तीसगढचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मर्कम यांनी देखील भाजपावर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल यांनी काँग्रेस पक्षाच्या घटनेत केलेल्या बदलांबाबत आनंद व्यक्त केला. काँग्रेसने पक्षाच्या कार्यकारिणीत ५० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांना यापुढे कार्यकारिणीत बरोबरचे स्थान दिले जाणार आहे. ते म्हणाले, आम्ही गोधन न्याय योजना आणि राजीव गांधी न्याय योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधला. भारतात कुठेच असे काम झालेले नाही. सरकारच्या योजनांचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला झाला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा भिलाई स्टिल प्लँट टाकला तेव्हा मोदींचे वय किती होते? तर फक्त पाच वर्ष. आमच्या चांगल्या कामांचा फायदा भाजपा उचलत आहे. जवाहरलाल नेहरूंनी उद्योग आणि सिंचनाच्या सोयी निर्माण केल्या. तुम्ही (मोदी सरकार) पाच वर्षात किती सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उभारल्या. एकही उदाहरण दाखवता येणार नाही, याउलट आहे त्या कंपन्या विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे.