Rajasthan Assembly Elections 2023 : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकांना महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांना पाठिंबा देणाऱ्या विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत. जयपूर येथे रविवारी (दि. २ एप्रिल) राजपूत समाजाच्या वतीने केसरिया महापंचायतीचे (Kesariya Mahapanchayat) आयोजन केले होते. या महापंचायतीच्या माध्यमातून आर्थिक मागास प्रवर्गासाठी (EWS) असलेले १० टक्क्यांचे आरक्षण वाढवून ते १४ टक्के करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ही महापंचायत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने (SRRKS) आयोजित करण्यात आली होती.

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी या महापंचायतीबद्दल माहिती देताना म्हणाले की, ही महापंचायत कोणत्याही राजकीय कारणांसाठी भरलेली नाही. आमच्या समाजातील युवकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची मागणी आहे की, EWS आरक्षणाची मर्यादा १० वरून १४ टक्के झाली पाहिजे. राज्य सरकारने क्षत्रिय राजपूत कल्याण मंडळाची स्थापना करावी. तसेच केंद्र सरकारने केंद्राच्या नोकरभरतीमध्ये आर्थिक मागास आरक्षणाच्या प्रवर्गाला आणखी सूट द्यावी, अशा मागण्या आम्ही करत आहोत. गोगामेडी पुढे म्हणाले की, कन्हय्या लाल या हल्लेखोरास पकडून देण्यात पोलिसांची मदत करणाऱ्या राजपूतांना सरकारी नोकरी दिली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्या आश्वासनाचे पुढे काय झाले? आता राजपूत समाजाच्या लाखो लोकांनी त्यासाठी आंदोलन करायचे का?

हे वाचा >> Rajasthan Politics: ब्राह्मण चेहऱ्यावर भाजपाचा विश्वास; पुनिया यांच्या जागी चंद्र प्रकाश जोशींची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेत आणखी पाच वर्षांची सूट देण्यात यावी. तसेच शैक्षणिक पात्रतेमध्ये देखील अशाच प्रकारची सूट द्यावी. इतर राखीव प्रवर्गांना अशा प्रकारे वयात आणि शैक्षणिक पात्रतेत सूट मिळत आहे, तशाच प्रकारे आम्हालाही द्यावी. आमच्या पूर्वजांनी राष्ट्र आणि हिंदू धर्मासाठी नेहमीच त्याग केला आहे, असेही गोगामेडी यांनी सांगितले. या महापंचायतीमध्ये उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते, कैसरगंजचे खासदार बृजभूषण शरन सिंह आणि उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी हजेरी लावली.

राजस्थानमध्ये दोन मोठ्या करणी सेनांपैकी गोगामेडी नेतृत्त्व करत असलेली श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (SRRKS) त्यापैकी एक आहे. काँग्रेसच्या आधी राज्यात भाजपची सत्ता असताना दोन्ही करणी सेनांनी भाजपच्या विरोधात आंदोलन केले होते. राजस्थानमध्ये भाजपला राजपूत समाजाचाच पाठिंबा आहे. मात्र गँगस्टर आनंदपाल सिंह याची चकमक आणि राजपूत नेते माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना बाजूला केल्यामुळे राजपूत समाजाची नाराजी भाजपला झेलावी लागली.

हे वाचा >> राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, शासकीय रुग्णालयांत आता मोफत उपचार, महत्त्वाचे विधेयक मंजूर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वीच जाट आणि ब्राह्मण समाजाच्या परिषदा पार पडलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जयपूरमधील त्याच विद्याधर नगर स्टेडियमवर राजपूत समाजाचीही महापंचायत संपन्न झाली. या केसरिया महापंचायतीमध्ये राजपूत समाजाचे नेते लोकेंद्र सिंह कलवी यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. करणी सेनेची महापंचायत होत असताना जयपूरमध्येच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची देखील एक महापंचायत पार पडली.