Salman Khurshid on Congress: भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावर काँग्रेसकडून सातत्याने टीका होत आहे. या सात शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर करत आहेत. यावरून त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना धारेवर धरलं. काँग्रेसकडून वारंवार टीका केली जात असताना सलमान खुर्शीद यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या या मोहिमेदरम्यान राजकीय निष्ठेचं मोजमाप केल्याबद्दल त्यांनी त्यांच्याच पक्षावर टीका केली आहे.
केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांमध्ये स्वत:च्याच वरिष्ठ नेत्याचा समावेश करण्यास विरोध केल्यामुळे काँग्रेसवर कडक टीका झाली आहे. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याच नेत्यांवर प्रामुख्याने शशी थरूर यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या दहशतवादविरुद्धच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल टीका केली आहे.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जगात भारताचा संदेश पोहोचवण्यासाठी दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेवर असताना कुटुंबातीलच लोक राजकीय निष्ठेचं मोजमाप करत आहेत हे फार दु:खद आहे. देशभक्त असणं इतकं कठीण आहे का?”
क्वालालांपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना खुर्शीद म्हणाले की, “आपण इथे जे काही करत आहोत ते देशासाठी आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी आज देशाच्या बाजूने बोलण्यासाठी एकत्रित आवाज उठवणं आवश्यक आहे आणि आपण इथे तेच करत आहोत. भारत सरकारला विरोध करण्यासाठी मी इथे नाही आलो. मी इथे भारतासाठी बोलण्यासाठी आलो आहे, माझ्यासाठी सर्वात प्रथम फक्त भारत आणि भारतच आहे.”
सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया
सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले की, “ही भावना दुःखद आणि अत्यंत विडंबनात्मक आहे. हे काँग्रेस पक्षाने दीर्घकाळापासून जोपासलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या विकृत कल्पनेची किंमत प्रतिबिंबित करते. असे करून त्यांनी अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली नैतिक स्पष्टता केवळ कमकुवतच केली नाही तर मतपेढीच्या राजकारणाच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षेशीही तडजोड केली आहे”, असे ते म्हणाले. “या सर्व गोष्टींना अधिक दुःखद बनवणारी गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षाचा असा विश्वास आहे की त्यांना राज्य करण्याचा दैवी अधिकार आहे. ही धारणा इतकी खोलवर रुजलेली आहे की ती अनेकदा पक्षाच्या हिताला देशाच्या कल्याणापेक्षा वर समजते. वेळोवेळी आपण राष्ट्रीय हिताचे बलिदान राजकीय स्वार्थापायी दिल्याचे पाहिले आहे. हे धोरण उदात्त वक्तृत्वात गुंडाळलेले, मात्र तत्वतः पोकळ आहे”, असेही मालवीय म्हणाले.
मालवीय यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जातीय राजकारण आणण्याचा, राज्याच्या शत्रूंना बळकटी देण्याचा आणि राष्ट्राचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचा सर्वपक्षीय शिष्टमंडळांबद्दल यु-टर्न
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला केंद्र सरकारला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. सर्वपक्षीय शिष्टमंडळे आपापल्या देशांना रवाना होताच काँग्रेसने राजनैतिक संपर्कावर टीका करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या विधानांनाही प्रत्युत्तर दिले.
भाजपाने शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्यासाठी नेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसने भाजपावर स्वस्त राजकीय खेळी केल्याची टीका केली. काँग्रेसचे चार वरिष्ठ नेते शशी थरूर, सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि अमर सिंग हे पक्षाशी सल्लामसलत न करता शिष्टमंडळात सामील झाल्याचे काँग्रेसने म्हटले. थरूर हे माजी राजनैतिक अधिकारी आहेत आणि खुर्शीद यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले आहे. मात्र, काँग्रेसने सुचवलेल्या नावांच्या यादीत अशा नेत्यांची नावेच नव्हती.
काँग्रेसने सातत्याने सरकारवर टीका केली आहे आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या लष्करी नुकसानाबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळे प्रामुख्याने संवेदनशील काळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
“आमचे खासदार फिरत आहेत आणि दहशतवादीही फिरत आहेत” या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी शशी थरूर यांच्या अलीकडच्या वक्तव्यावरही टीका केली. थरूर यांनी सरकारच्या दहशतवादविरोधी भूमिकेबद्दल केलेले स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
पनामातील थरूर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी एक अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर पक्षाने त्यांना ‘भाजपाचे सुपर प्रवक्ता’ असे संबोधले. मात्र, थरूर यांनी या वक्तव्यांना फेटाळून लावत भारतात परतल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.