शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) सुवर्ण मंदिरातील केंद्रीय शीख संग्रहालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे छायाचित्र स्थापित करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाबतीत शीख राजकारणातील पेच पुन्हा एकदा समोर आला आहे. या संग्रहालयात सर्व प्रसिद्ध शीख व्यक्तींची चित्र आहेत. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची हत्या केल्याप्रकरणी बलवंत सिंग राजोआना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या संदर्भात राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यात आली आहे, त्या बलवंत सिंग राजोआना यांनी मनमोहन सिंग यांच्या छायाचित्राबाबत आक्षेप घेतला होता. त्यानंतर एसजीपीसीने त्या छायाचित्रासंदर्भात पुनर्विचार करून, स्थगितीचा हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. नेमका हा वाद काय? त्यांचे छायाचित्र संग्रहालयात लावण्यास विरोध का होत आहे? जाणून घेऊ…
छायाचित्रावर आक्षेप का?
एका पत्रात, बलवंत सिंग राजोआना यांनी ‘एसजीपीसी’चे पाऊल अयोग्य व अस्वीकार्य असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलींमध्ये ?काँग्रेस सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात दंगल आणि त्यापूर्वी झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारद्वारे काँग्रेसने घेतलेेल्या भूमिकेबद्दल शिखांच्या मनात आजही संताप आहे. त्यामुळे ‘एसजीपीसी’ने राजोआना यांच्या आवाहनाचा विचार करण्यास फारसा विलंब केला नाही. १९९२ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर शीख अतिरेक्यांनी केलेल्या बहिष्काराच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अकाली दलाने निवडणूक लढवली नव्हती.
एसजीपीसी आणि मनमोहन सिंग
एसजीपीमध्ये आजही काँग्रेसविरुद्ध भावना असल्याचे दिसून येते. २००२ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्री म्हणून अमरिंदर सिंग पहिल्यांदाच सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा योग्य तो सन्मान करणे नाकारण्यात आले होते. परंतु, एसजीपीसीने मनमोहन सिंग यांनी भेट दिली असता, त्यांचा योग्य तो सन्मान केला होता. २००४ मध्ये मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांच्यासह एसजीपीसीच्या नियंत्रणाखाली असलेल्या सुवर्णमंदिराला भेट दिली होती. त्या प्रसंगी त्यांचे योग्य ते स्वागत केले गेले होते.
११ ऑगस्ट २००५ रोजी राज्यसभेत भाषण करताना मनमोहन सिंग यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीबद्दल माफी मागितली होती. त्यापूर्वी कोणत्याही काँग्रेस नेत्याने असे केले नव्हते. मनमोहन सिंग शीख असल्याने त्यांची ही माफी महत्त्वाचे पाऊल मानले गेले होते. “मला शीख समुदायाची माफी मागण्यास कोणताही संकोच नाही. मी केवळ शीख समुदायाचीच नाही, तर संपूर्ण देशाची माफी मागतो. कारण- १९८४ मध्ये जे घडले, ते आपल्या संविधानात समाविष्ट असलेल्या राष्ट्रत्वाच्या संकल्पनेचे उल्लंघन आहे,” असे मनमोहन सिंग आपल्या भाषणात म्हणाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यानंतर अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या गोंधळाबद्दल भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर टीका केली होती.
मनमोहन सिंग यांचे छायाचित्र लावण्याच्या निर्णयावर माघार घेतल्याबद्दल काँग्रेसने एसजीपीसीवर टीका केली आहे. त्यांनी या निर्णयाला लज्जास्पद म्हटले आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व गुरुदासपूरचे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले, “मनमोहन सिंग यांच्यामुळेच जगभरात या पगडीला मान्यता मिळाली. देशाच्या लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के लोकसंख्या असूनही ते १० वर्षे पंतप्रधान राहिले. ही कामगिरी आपण साजरी करण्यासारखी नाही का? छायाचित्र स्थापित करण्याचा हा निर्णय रोखून आपण मनमोहन सिंग यांच्याशी कोणताही न्याय करत नाही आहोत. मनमोहन सिंग यांनी पंजाबला अनेक प्रकल्प आणि निधी दिला आहे. त्यांचे छायाचित्र संग्रहालयात का लावू नये? हे सांगावे”, असेही ते म्हणाले.
राजोआना यांची अकाली दलातील भूमिका
शीख अतिरेकी अनेकदा अनेक मुद्द्यांवरून अकाली दलावर टीका करीत आले आहेत. मात्र, राजोआना नेहमीच पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१२ मध्ये त्यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजोआना चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांना स्वतःला आणि त्यावेळी पंजाबचे नेतृत्व करणाऱ्या अकाली दलाबद्दल सहानुभूती मिळाली. त्यानंतर पंजाबमधील अकाली दल-भाजपा सरकारने राजोआना यांची फाशी पुढे ढकलण्यासाठी अनेक राजकीय आणि प्रशासकीय उपाययोजना यशस्वीरीत्या राबवल्या.
फाशीच्या नियोजित तारखेच्या एक आठवडा आधी अकाल तख्तचे तत्कालीन जथेदार ग्यानी गुरबचन सिंग यांनी राजोआना यांना ‘जिंदा शहीद’ (जिवंत हुतात्मा) घोषित केले होते. या निर्णयामुळे राजोआना हे अकाली दल आणि एसजीपीसीच्या जवळ आल्याचे मानले जाते. २०१४ पासून राजोआना यांनी उघडपणे लोकांना अकाली दलाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अकाली दलाच्या अडचणींत वाढ
अकाली दलाची पंजाब विधानसभेत आणि लोकसभेत प्रत्येकी एक जागा कमी झाली आहे. अकाली दल अनेक मार्गांनी पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणूनच राजोआना यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. राजोआना यांच्या पत्रानंतर एसजीपीसीचे सचिव प्रताप सिंग म्हणाले, “एसजीपीसी शीख समुदायाच्या भावनांचा आदर करते. त्यामुळे या विषयावर शिखांमध्ये सामान्य सहमती आवश्यक आहे, असे संस्था मानते. भविष्यातील कार्यकारी समितीच्या बैठकीत छायाचित्राबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल.” हरचरण सिंग बैन्स म्हणाले की, या प्रस्तावावर निर्णय घेणारी एसजीपीसी ही एकमेव सक्षम संस्था आहे. ते म्हणाले, “माझ्या मते, या प्रकरणात वैयक्तिक काहीही नाही. कारण- राजोआना यांची भावना मनमोहन सिंग ज्या पक्षाशी संबंधित होते, त्या पक्षाने शीखविरोधी घेतलेल्या भूमिकेशी संबंधित आहे.”