छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेतील फुटीनंतर संघटनात्मक दृष्ट्या विस्कळित झालेल्या शिवसेनेला बळ देण्यासाठी १६ मे रोजी पाणीप्रश्नावरून हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. महिनाभरापासून विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना विविध आंदोलनात्मक कार्यक्रम दिले.यातून सत्ताधारी भाजपाचे नेते पाणी प्रश्न सोडविण्यास जबाबदार असल्याचा संदेश देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर शहरात वितरणातील दोषामुळे आठ दिवसाला एकदा पाणी येते. त्यातून निर्माण झालेला रोष शिवसेनेच्या बाजूने वळवा म्हणून हल्लाबोल मोर्चाची जय्यत तयारी केली जात आहे. या मोर्चेचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत.’लबाडांनो पाणी द्या’ या घोषवाक्यासह शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने पाण्याच्या टाकीचे प्रतीकात्मक पूजन केले. हंडा मोर्चा काढला. आज अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी पाणी प्रश्नावर संवाद साधला. ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख राजकीय पटावरून पुसली जावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये जोर लावला होता. सध्या अंबादास दानवे वगळता विधीमंडळात ठाकरे गटाचे नेतृत्व करणारे कोणी नाही. फुटीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.त्यामुळे आंदोलनातून नवी बांधणी करण्यासाठी हा मोर्चा अधिक महत्वपूर्ण मानला जात आहे.
पाण्याची समस्या तीव्र आहे. हे सरकारलाही माहीत आहे. भाजपाचे सरकार आल्यावर हा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही आंदोलन हाती घेतल्याचे शिवसेनेकडून सांगितले जाते. गेल्या १५ वर्षापासून शहराला सरासरी पाच दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो. वीज गेली किंवा जलवाहिनी फुटली की पाण्याचा खंड वाढतो. त्यामुळे शिवसेनेचा हा मोर्चा भव्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.