ठाणे : राज्यातील सरकार स्थापनेत आमचा कोणताही अडसर नाही. भाजप नेते मुख्यमंत्रीपदासाठी जो उमेदवार ठरवतील, त्याला आमचे समर्थन असेल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली. ‘मी नाराज नाही आणि सत्ता स्थापनेत माझ्या पक्षाचा अडसरही नसेल, असे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दूरध्वनीवरून कळविले आहे. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी जसा अंतिम असतो, तसा ‘एनडीए’चे नेते म्हणून आम्हालाही तो मान्य असेल,’ अशी आमची भूमिका असल्याचे शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.

मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत गेल्या तीन दिवसांपासून मोठा पेच निर्माण झाला होता. ठाण्यातील आपल्या निवासस्थानी बुधवारी बोलविण्यात आलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा >>>विधानसभेत मविआची दाणादाण उडाल्यानंतर ‘ईव्हीएम’वर शंका; काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पुन्हा मतपत्रिकेची मागणी

‘गेल्या काही दिवसांपासून मी नाराज आहे. घरात लपून बसलो आहे, अशा स्वरुपाच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. मी एवढेच सांगेन की सत्तास्थापनेबाबत कुठेही घोडे अडलेले नाही. मी मनमोकळेपणाने सांगतो आहे की, मी काहीही ताणून धरलेले नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून सांगितले की, आमच्यामुळे सरकार बनवताना कुठलीही अडचण येईल, असे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी अंतिम असतो, तसा आम्हालाही तो अंतिम आहे. भाजप मुख्यमंत्री पदासाठी जो उमेदवार ठरवेल, त्याला माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल,’ अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

उद्धव ठाकरे यांना टोला

‘मी लपणारा नाही तर लढणारा शिवसैनिक आहे. आम्ही लढून काम करणारे लोक आहोत, मी नाराज वगैरे मुळीच नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केले, ते मनापासून केले, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Ajit Pawar : एकनाथ शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ अजित पवारांनी कशी संपवली? शरद पवारांच्या पावलावर पाऊल कसं ठेवलं?

सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’

विधानसभा निवडणूक प्रचारात मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केले. पायाला भिंगरी लावून काम केले. ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ अशी माझी धारणा आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता. महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही केले पाहिजे, असे मला कायमच वाटत होते. मी शेतकरी कुटुंबातून आलो असल्यामुळे सामान्यांच्या वेदना, काटकसर, तडजोडी सगळे पाहिले आहे. त्यामुळेच या सर्वांसाठी योजना राबविल्या, असेही ते म्हणाले.

लाडका भाऊ’ हीच माझी ओळख…

● महायुती सरकारने केलेल्या कामांमुळे आमच्यावर निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला. ‘लाडक्या बहिणीं’चा ‘लाडका भाऊ’ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. या लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण, ते ओळखले. याबद्दल मी समाधानी आहे. लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे.

● महायुती जेवढ्या मजबुतीने जिंकली, तेवढी आमची जबाबदारी वाढली आहे. अजून खूप काम करायचे आहे. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलेही मोजमाप व्हावे यासाठी काम केलेले नाही. सरकार म्हणून काय देऊ शकतो, ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली. या दोन्ही नेत्यांनी आमच्या सरकारला पाठबळ दिल्यामुळेच अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला. आमच्या सरकारने जे निर्णय घेतले, ते आजवर कोणीही घेतलेले नाहीत. हे सर्व निर्णय रेकॉर्डब्रेक आहेत.- एकनाथ शिंदेमुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला . (छाया – दीपक जोशी)