त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांचा विधानसभा  पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. त्रिपुरामध्ये अचानक नेतृत्व बदल करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आणि माणिक सहा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणिक सहा यांनी बारडोवली मतदार संघातून निवडणूक लढवली. ही निवडणूक माणिक सहा यांनी लढवलेली त्यांच्या आयुष्यातील पहिली थेट निवडणूक होती. त्रिपुरात एकूण चार जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली होती.चारपैकी तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. ६९ वर्षीय माणिक सहा हे दंत शल्यचिकित्सक आहेत. वैद्यकीय क्षेत्रातून राजकारणात आलेले साहा हे राज्यसभा सदस्य होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. 
त्रिपुरा पोटनिवडणूक ही गटबाजीने ग्रासलेल्या भाजपसाठी तसेच मुख्यमंत्री माणिक सहा यांच्यासाठी एक मोठी चाचणी होती. या निवडणुकीच्या निकाललावर फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीची दीशा ठरणार आहे. मुख्यमंत्री सहा यांना स्वतःची जागा पक्की करण्यासाठी ही निवडणूक जिंकणे गरजेचे होते. सहा यांच्या नियुक्तीनंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आले होते. त्यामुळे हायकमांडचा त्यांच्यावर असलेला विश्वास टिकुन रहावा यासाठी त्यांना निवडणुकीत निवडून येणे गरजेचे होते. 

पोटनिवडणुकीच्या निकालांवर समाधान व्यक्त करताना, त्रिपुरा भाजपचे मुख्य प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती म्हणाले की “राज्य सरकार आता २०१८ च्या निवडणूकीच्या वेळी लोकांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. वेळ कमी पडल्यामुळे आम्ही २०१८ मध्ये दिलेली काही आश्वासने पूर्ण करू शकलो नाहीत. त्यामुळे निवडणुकी पूर्वी जास्तीत जास्त वचनपूर्ती करण्यावर आमचा भर असणार आहे.  ही कामं आम्ही विहित कालमर्यादेत पूर्ण करू आणि पुढच्या वर्षी त्याच रिपोर्ट कार्डसह निवडणुकीत उतरू”

त्रिपुरामधील आगरतळा हा मतदार संघ काँग्रेसने जिंकला असला तरी, इतर तीन जागांवर त्यांचे तीन उवेदवार पराभूत झाले आहेत. त्यांचे बारडोवलीचे उमेदवार आशिष कुमार सहा हे पराभूत झाले आहेत. आशिष कुमार हे तीन वेळा भाजपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी २०२२ च्या सुरवातीला भाजपाला सिडचिट्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना मुख्यमंत्री माणिक सहा यांनी पराभूत केले. काँग्रेसने या पराभवाचे खापर सत्ताधारी भाजपावर फोडले असून राजकीय हिंसाचार आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचा आरोप केला आहे.