द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. उदयनिधी यांच्या याच विधानाचा आधार घेत भाजपाचे नेते विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका करत आहेत. उदयनिधी यांनी जे विधान केले होते, तीच भूमिका आघाडीची आहे का? हे काँग्रेस तसेच आघाडीतील पक्षांनी स्पष्ट करावे, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एम. के. स्टॅलिन यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सनातन धर्मावरील वाद मिटलेला नसताना त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. भाजपाकडून जनतेचे प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे स्टॅलिन म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत- स्टॅलिन

स्टॅलिन यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई आदी विषयांवर भाष्य करत एका प्रकारे भाजपाला आव्हान दिले आहे. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. देशातील जनतेचा केंद्रातील मोदी सरकारवरील विश्वास उडाला आहे. मोदी सरकारकडून फक्त जाहिरातबाजी केली जात आहे,” असे स्टॅलिन म्हणाले. माध्यमांत चर्चा घडवून भाजपा देशातील मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सरकारच्या वेगवेगळ्या विभागांत भ्रष्टाचार- स्टॅलिन

एम. के. स्टॅलिन यांनी भाजपावर मणिपूरमधील हिंसाचार, काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन, नोकऱ्या देण्याचे आश्वासन आदी मुद्द्यांवरून टीका केली. तसेच कॅगच्या अहवालाचा आधार घेत त्यांनी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. यासह अदानी प्रकरण, राफेल विमान खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी मोदी आणि भाजपावर टीका केली.

२० लाख तरुणांना नोकरी मिळाली का- स्टॅलिन

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? शेतकऱ्यांचे आहे ते उत्पन्नही कमी झाले आहे. साधारण २० लाख तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, तरुणांना नोकरीची संधी मिळालीच नाही. प्रत्येक कुटुंबाचे स्वत:चे घर असेल, असे ते म्हणाले होते. मात्र, सध्या देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर आहे, असे म्हणता येईल का?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून स्टॅलिन यांची टीका

मणिपूर हिंसाचारावर बोलताना “गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये अस्थितरता आहे, या राज्यात कणा नसलेले भाजपाचे सरकार आहे. दोन दिवसांपूर्वीच तेथे गोळीबाराची घटना घडली. या सर्व मुद्द्यांकडे लक्ष न देता भाजपाकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे,” अशी टीका स्टॅलिन यांनी केली.

आघाडीचे सरकार आणण्यासाठी जनता सज्ज

मोदी सरकार राज्यांच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे; असे करून ते लोकांच्या भावनेचा अपमान करत आहेत. आता भाजपाचे सरकार जाणार आहे, भाजपाची सत्ता उलथवून लावून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. सध्या भाजपाकडून देशाचे नाव बदलण्याचा विचार केला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांत इंडिया आघाडीने उत्तम कामगिरी केली आहे, असेही स्टॅलिन म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी एम. के. स्टॅलिन काय म्हणाले होते?

दरम्यान, सनातन धर्माचे निर्मूलन करायला हवे, असे विधान उदयनिधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे देशभरातील भाजपाचे नेते आक्रमक झाले होते. पुत्राच्या या विधानानंतर एम. के. स्टॅलिन यांनी संयमाची भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. “भाजपाचा गैरसमज झाला असावा, सनातन धर्माचे निर्मूलन करायला हवे, असे उदयनिधी म्हणाले. मात्र, सनातन धर्मातील वाईट परंपरा नष्ट करायला हव्यात, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता,” असे स्पष्टीकरण स्टॅलिन यांनी दिले होते. तसेच भाजपाच्या कोणत्याही नेत्याविरोधात पोलिसांत तक्रार करू नका, असे आवाहन उदयनिधी यांनी त्यांच्या समर्थकांना केले होते.