MP Imran Masood on India Alliance : भाजपाला केंद्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी एकजुटता दाखवत इंडिया आघाडीची मोट बांधली. परिणामी महाराष्ट्र व उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात भाजपाचं लोकसभेतील संख्याबळ कमी झालं. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने काँग्रेसबरोबर हातमिळवणी करून भाजपाचं मोठं नुकसान केलं. दोन्ही पक्षांनी मिळून लोकसभेच्या ८० जागांपैकी तब्बल ४३ जागा आपल्या पारड्यात टाकल्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पार्टीची युती होणं जवळपास अशक्यच मानलं जात होतं. कारण, त्याआधी २०२३ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांत तणाव दिसून आले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पार्टी व काँग्रेसमधील संबंध पुन्हा ताणले गेले. ज्यामुळे ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती झाली नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी एकत्र येणं टाळलं. विशेष म्हणजे, या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील सहारनपूर मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार इम्रान मसूद हे या युतीतील एक महत्त्वाचे चेहरा होते. अलीकडेच त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखतीत काँग्रेसचं नुकसान कशामुळे होतंय? भाजपा त्यांच्या मित्रपक्षांना कसं संपवतंय, यावर भाष्य केलं. नेमके काय म्हणाले इम्रान मसूद? जाणून घेऊ…
प्रश्न : समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्यातील युतीमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाला आणि परस्पर आरोपही झाले. असं वारंवार का घडतं?
“दोन्ही पक्षांत कोणताही तणाव नाही. काँग्रेस पक्ष आपली संघटना मजबूत करण्यासाठी काम करत आहे. काहींचे असे मत आहे की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे उमेदवारच असणार नाहीत. मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही बुथ पातळीवर कठोर मेहनत घेत आहोत. आम्हाला कोणाच्याही आधाराची गरज नाही. विधानसभेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार”, असं उत्तर खासदार इम्रान मसूद यांनी दिलं. ते म्हणाले की, जर समाजवादी पार्टीबरोबर आमची युती झालीच तर आम्ही कोणत्या जागांवर लढायचं हे ठरविण्याचा त्यांना अधिकार राहणार नाही. तो निर्णय काँग्रेसचं नेतृत्व घेईल.
आणखी वाचा : Operation Sindoor : संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वाद का निर्माण झाला?
प्रश्न : समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या युतीबाबत तुम्हाला काय वाटतं?
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी व काँग्रेसमध्ये युती झाली होती; पण उत्तर प्रदेशातील एकूण ८० जागांपैकी आम्हाला फक्त १७ जागा देण्यात आल्या होत्या. हे यापुढे चालणार नाही. मतदारांनी राहुल गांधी यांच्याकडे पाहून मतदान केलं असून जनतेत त्यांच्याविषयी सकारात्मक भावना आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत जर दोन्ही पक्षांना युती करायची असेल, तर ती सन्मानपूर्वक असली पाहिजे”, असं खासदार इम्रान मसूद यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रश्न : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत जर सपा-काँग्रेसची युती झालीच, तर काँग्रेसने किती जागांवर लढावं असं तुम्हाला वाटतं?
“२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४०३ जागांवर तयारी करत आहोत. जर युती झालीच, तर ती समानतेवर आधारित असली पाहिजे. त्यांनी असं म्हणू नये की, “या जागा आम्ही तुम्हाला देतोय”… हा निर्णय काँग्रेस नेतृत्व करेल. आम्ही समाजवादी पार्टीकडे स्वत:हून काहीच मागणार नाही”, असं खासदार इम्रान मसूद म्हणाले.
प्रश्न : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच झालेल्या उत्तर प्रदेशातील नऊ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने भाग घेतला नाही, कारण काँग्रेसला हव्या असलेल्या चार जागा सोडण्यास ‘सपा’ने नकार दिला होता, असं म्हटलं जातं. त्यावर काँग्रेसने तडजोड का केली?
खासदार मसूद म्हणाले, “हाच तर माझा मुद्दा आहे… त्यांनी (समाजवादी पार्टी) आम्हाला सांगितलं की, तुम्ही या जागांवर लढा. मग आमच्यावतीने तुम्ही निर्णय का घेताय? जर दोन्ही पक्षांत युती आहे, तर आम्ही आमच्या जागांबद्दल स्वतः निर्णय घेऊ. समाजवादी पार्टीकडून दरवेळी आम्हाला अशा जागा सोडण्यात येतात की जिथे आमचा पराभव होतो. म्हणूनच आम्ही पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती.”
“भाजपा मित्रपक्षांना संपवतंय, काँग्रेसचं युतीमुळे नुकसान होतंय”
खासदार इम्रान मसूद म्हणाले, “निवडणुकांमध्ये छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर युती केल्याने काँग्रेसचे नुकसान होत आहे. एकीकडे भाजपा त्यांच्या मित्रपक्षांना संपविण्याचं काम करतंय, तर दुसरीकडे आमचे मित्रपक्ष आम्हालाच गिळून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
प्रश्न : २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी वेगवेगळे लढले तर भाजपाला फायदा होईल? मुस्लीम मतांचं विभाजन होईल का?
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष जरी वेगवेगळे लढले तरी त्याचा भाजपाला काहीच फायदा होणार नाही. मुस्लीम मतांचंही विभाजण होणार नाही, कारण जनतेला माहिती आहे की, भाजपाला कडवी झुंज देण्याची ताकद फक्त राहुल गांधींमध्येच आहे. समुद्रात वादळ असतं तेव्हा त्याचा सामना जहाजं करतात, होड्या नाही. सध्या देशात एक राजकीय वादळ सुरू आहे. सगळ्यांनी काँग्रेसच्या जहाजावर चढलं पाहिजे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो कधीही भाजपाशी हातमिळवणी करू शकत नाही, असं खासदार मसूद यांनी स्पष्ट केलं आहे.