आगामी लोकसभा निवडणुकीला अवघा एक वर्षाचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ जून २०२३ रोजी घडलेल्या वॉशिंग्टन आणि पाटणा येथील दोन घटना महत्त्वाच्या ठरतात. पंतप्रधान नरेंद्र यांच्या स्वागतासाठी अमेरिकेत लाल गालिचा अंथरण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदी यांचे स्वागत केले. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेले शाकाहारी जेवण आणि अमेरिका काँग्रेसमध्ये मोदी यांचे भाषण (काँग्रेसमध्ये दोनदा भाषण करणारे मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत) झाले. तंत्रज्ञान, अंतराळ आणि संरक्षण करार, फायटर जेट्स इंजिन अशा अनेक विषयांवर भारत-अमेरिका दरम्यान करार झाले. हे सर्व त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली होत आहेत, ज्याला अमेरिकेने काही वर्षांपूर्वी व्हिजा नाकारला होता. मोदी यांचा अमेरिका दौरा हा काळजीपूर्वक रचलेला आणि प्रयत्नपूर्वक अमलात आणलेला दौरा आहे. हा दौरा २०२४ साठी भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो द्विपक्षीय संबंधातील सुधारणांसाठीही महत्त्वाचा आहे.

दुसरीकडे भारतात पाटणा येथे आणखी एक बैठक झाली, ज्याकडे देशाचे लक्ष लागले होते. बिहार, पाटणामधून अनेक परिवर्तनवादी चळवळींनी जन्म घेतलेला आहे. जसे की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील बिहार चळवळीने १९७७ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सत्तेवरून खाली खेचले होते. २०१४ साली भाजपाला पराभूत करण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षांचे नेते पाटणा येथे एकवटले होते.

हे वाचा >> व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्याचे नवे पर्व; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात भरघोस करार

विरोधक याआधीदेखील दोन वेळा एकत्र आले होते. पण त्यातून ठोस असे काही निष्पन्न होऊ शकले नाही. पण पाटणा येथे झालेली बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यांचे आणि काँग्रेसचे गंभीर मतभेद राहिले आहेत. त्यांच्याशिवाय ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांचेही काँग्रेसशी मतभेद आहेत. पाटणा येथील बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित होते.

बहुतेक राज्यातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमधूनच मोठे झालेले आहे. विरोधक एकत्र आल्यास काँग्रेस हा मोठ्या भावाप्रमाणे इतरांना वागणूक देईल, अशी समजूत प्रादेशिक पक्षांमध्ये आहे. त्यामुळे विरोधक एकत्र येण्यास अडथळे निर्माण होत होते, मात्र आता प्रादेशिक पक्षांनाही समजून चुकले आहे की, काँग्रेसशिवाय विरोधकांची एकी व्यर्थ आहे. चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता की डावे यांच्यात काँग्रेसला निवड करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशमध्येही जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत संभ्रम आहे, आपसोबत कसे जुळवून घ्यायचे हा प्रश्न आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत आपने केंद्र सरकारच्या वटहुकुमाबाबत काँग्रेसने निर्णय घ्यावा, अशी मागणी रेटून धरली. शुक्रवारच्या बैठकीत आपला वटहुकुमाच्या मुद्द्यावर विरोधकांचा फारसा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांना या एकजुटीबद्दल नव्याने विचार करावा लागणार आहे.

भूतकाळात पाटणा शहरात अनेकदा काँग्रेसविरहित पक्षांना एकत्र आणून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला आहे. आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. देशातील राजकारण दोन आघाड्यांमध्ये विभागले आहे. एका आघाडीचे नेतृत्व भाजपा करीत आहे, तर दुसरीकडे भाजपाविरोधी आघाडी आहे. ज्यामध्ये काँग्रेसचा समावेश आहे.

हे ही वाचा >> विरोधकांची संयुक्त बैठक संपली, नितीश कुमारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले, “सर्व पक्ष…”

या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्तदेखील आणखी काही पक्ष आहेत. पण त्यांचा ओढा भाजपाकडे अधिक राहिला आहे. ओदिशामधील नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतो. तसेच केंद्रात जो कुणी सत्तेत येतो, त्या पक्षाला विविध विषयांच्या आधारावर पाठिंबा देतो. त्याच प्रकारे आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआरसीपी हा पक्ष आहे. तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव हेदेखील यांचे निर्णय काहीसे वेगळे आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे विरोधकांच्या एकजुटीची भाषा बोलतात, मात्र भाजपापेक्षाही जास्त टीका ते काँग्रेसवर करतात. तसेच तेलंगणाव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातही इतर पक्षाचे नेते फोडून पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.

विरोधकांनी ज्याप्रमाणे सर्व पक्षांच्या एकजुटीचा प्रयत्न सुरू केला आहे त्याप्रमाणे भाजपादेखील मित्रपक्षांबाबत आपली रणनीती बदलण्याच्या विचारात आहे. दक्षिण भारतात भाजपाचा फारसा प्रभाव नाही. तसेच उत्तर भारतात मागच्या दहा वर्षांपासून एकहाती विजय मिळवल्यानंतर काही प्रमाणात अँटी-इन्कम्बन्सीचा सामना भाजपाला करावा लागू शकतो, याची जाणीव त्यांच्यामध्ये आहे. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षासोबत भाजपाची आघाडी आहे, तसेच आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठक घेऊन आघाडीबाबत चर्चा केली आहे. तसेच भाजपाने पंजाबमधील जुना मित्रपक्ष अकाली दलालाही पुन्हा आपल्यासोबत घेण्यासाठी चर्चा केली आहे. कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव सहन करावा लागल्यामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळून भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.

पाटणा येथील विरोधकांच्या बैठकीला उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकशाही दलाने दांडी मारली. राष्ट्रीय लोकशाही दलाचे नेते जयंत चौधरी यांचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले आहे. चौधरी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता पक्षाने फेटाळून लावली आहे. तसेच पाटणा येथे होणाऱ्या बैठकीच्या एकदिवस आधी जेडी(यू) चा मित्र पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवामी मोर्चाच्या जीन मांझी यांनी जेडीयूची साथ सोडून एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

विरोधकांची एकजूट झाली तरी मोदींना टक्कर देणारा आणि सर्वमान्य असणारा नेता निवडणे हे विरोधकांसमोरील मोठे आव्हान आहे. भाजपाला पक्ष म्हणून देशभरात काही ठिकाणी फटका बसला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत विरोधकांनी भाजपा किंवा एनडीएच्या उमेदवाराविरोधात एकच उमेदवार उभा करून निवडणूक लढविण्याच्या विचारावर चर्चा केली. जास्तीत जास्त मतदारसंघात मतांची विभागणी टाळण्याच्या विषयावर विरोधकांचे एकमत झाले.

आणखी वाचा >> VIDEO: विरोधी पक्षाची बैठक संपल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देशात धार्मिक तेढ..”

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौऱ्याचा भाजपाला फायदा व्हावा, असा प्रयत्न केला जात आहे. बेरोजगारी, उत्पन्नात झालेली घट, खर्चामध्ये झालेली वाढ या सर्व समस्यांवरून लक्ष हटविण्यासाठी अमेरिका दौऱ्यात भारतीयांचा अभिमान वगैरे जागा केला जात आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. मुंबईमधील एका डॉक्टरने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “गवारच्या भाजीचा दर १४० रुपये प्रति किलो झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गवारचे पीक घेतले जाते, तरीही याचा दर वाढला आहे. तसेच आमच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला तर रोजच्या भाज्या घेणे अवघड झाले आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका दौऱ्याप्रमाणेच आगामी काळात मोदींची प्रतिमा उंचावणारे अनेक कार्यक्रम प्रस्तावित आहेत. सप्टेंबर २०२३ महिन्यात जी२०ची परिषद होणार आहे, जगातील प्रभावशाली नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिराचे उदघाटन होत आहे. या सर्व कार्यक्रमाचा विचार करता विरोधी पक्षाकडे याला विरोध करण्यासाठी फारसे मुद्दे नाही.