३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर दोन दिवस मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या काळातच इंडियाच्या घटक पक्षांना मोठा धक्का देण्याची व्यूहरचना सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपने आखली आहे. यामुळेच हा दणका काय असेल, याचीच राजकीय वर्तुळात आता उत्सुकता आहे. इंडिया विरोधकांच्या आघाडीची दोन दिवसांची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील पवार गट सारी मदत करीत आहे. दोन दिवसांच्या बैठकीच्या तयारीसाठी सध्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून मुंबई व राज्यात वातावरणनिर्मिती करण्याचा शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचा प्रयत्न आहे. हेही वाचा - काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना आता ‘घरवापसी’चे वेध इंडिया आघाडीच्या बैठकीच्या काळातच विरोधकांना मोठा धक्का देण्याची योजना शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपने आखली आहे. इंडियाच्या बैठकीवर सारा झोत राहू नये या उद्देशानेच ही खेळी असल्याचे सांगण्यात येते. अलीकडेच वर्षा बंगल्यावर झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर खल करण्यात आला. बैठकी दरम्यान विरोधी आघाडीतील कोण मोठा नेता फुटणार की अन्य कोणावर कारवाई होणार याबाबत इंडियाचे नेतेही वेध घेत आहेत. हेही वाचा - हरियाणातील जेजेपी पक्ष राजस्थानची विधानसभा निवडणूक लढवणार, काँग्रेसची अडचण वाढणार? इंडियाची बैठक योग्यपणे पार पडेल. विरोधकांचे आव्हान पेलवत नसल्यानेच सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.