केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक व्हिजनरी म्हणजेच एक दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळखले जातात. याच नितीन गडकरी यांनी एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात आपल्या आगामी प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसंच लोकशाही म्हणजे काय? याची व्याख्याही सांगितली. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आप या पक्षाचा उदय होणं यावरही आपल्या शैलीत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकशाहीबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?
मी भाजपचा माणूस आहे, आरएसएसवाला आहे हे असं मी सांगितलं. जेव्हा निवडणूक असते तेव्हा सगळे प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतो. निवडणूक संपली की आम्ही मित्र असतो. मी आणीबाणीच्या काळात राजकारणात आलो. मला एका चांगल्या प्राध्यपकांनी सांगितलं की विचारभिन्नता ही समस्या नाही. विचारशून्यता ही समस्या आहे. मी तुम्हाला लोकशाहीची व्याख्या सांगतो. जे लोक तुम्हाला मतं देतात त्यांच्यासाठी काम कराच पण जे तुम्हाला जे मत देत नाहीत त्यांच्यासाठीही काम करा. यालाच लोकशाही म्हणतात.

भाजपची इमेज बदलली
आमच्या भाजपचीही एक इमेज होती. एक काळ असा होता की भाजपमधले लोक धोतर घालायचे, कोट घालायचे टोपी घालायचे आणि गंध लावायचे. आता काळ बदलला. आता शर्ट पँट घालणारे लोकही भाजपमधले आहेत. मी भाजपमध्ये आलो तेव्हा ही अशी स्थिती होती. मात्र परिवर्तन झालं. भाजपची विचारधारा आजही जी आधी होती तीच आहे. मात्र परिवर्तन अनेक गोष्टींमध्ये झालं आहे. चांगले बदल स्वीकारायला काय हरकत आहे? मी भाजपमध्ये असताना श्रीकांत जिचकार म्हणून माझे एक मित्र होते ते काँग्रेसमध्ये होते. ते मला म्हणाले की नितीन तू खूप चांगला नेता आहेस. मात्र चुकीच्या पक्षात आहेस, तू या पक्षात राहून काहीच करू शकत नाही. तू काँग्रेसमध्ये ये. मी त्यांना सांगितलं मी एक वेळ विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये येणार नाही. मला आठवतंय एक काळ असा होता भाजपमध्ये ज्यांचं डिपॉझिट वाचायचं त्यांचा सत्कार होत असे. आता आम्ही जिंकलो आहोत, सत्तेत आहोत. मात्र आम्ही आमच्या विचारधारांपासून मागे आलेलो नाही.

रस्ते विकासाबाबत काय म्हटलं आहे नितीन गडकरींनी?
भारतात ज्या पायाभूत सोयी आणि सुविधा आपण आणत आहोत त्या पाहिल्या तर २०२४ च्या आधी आपल्या रस्त्यांची स्थिती ही अमेरिकेप्रमाणे असेल असं मला वाटतं. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केला आहे. आता आमचं लक्ष्य आहे ते पुणे ते नागपूर हा महामार्ग आणण्याचं. आम्ही आत्ता पुणे ते नागपूर हे अंतर कापायला सध्या १६ तास लागतात हे अंतर आम्हाला सात तासांवर आणायचं आहे. मी जेव्हा एखादी गोष्ट करायची हे ठरवतो आणि ते सांगतो तेव्हा मी ते पूर्ण करतो. जी आश्वासनं पूर्ण करता येत नाहीत ती मी देत नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

पुणे नागपूर महामार्ग आणून आम्हाला जसं ते अंतर कमी करायचं आहे त्याचप्रमाणे इतरही मार्ग आम्ही आणतो आहोत. दिल्लीते देहरादून, हरिद्वार ते जयपूर हे मार्ग अवघ्या दोन तासात अंतर कापता येतील असे तयार करतो आहोत. दिल्लीहून चंदीगढला येणारा मार्ग अडीच तासात ते अंतर कापता येईल असा तयार करतो आहोत. तसंच आम्ही आणत असलेल्या मार्गांमुळे दिल्ली ते अमृतसर हे अंतर चार तासात, दिल्ली ते कटरा सहा तासात, दिल्ली ते श्रीनगर हे अंतर आठ तासात कापलं जाईल. एवढंच काय दिल्ली ते मुंबई १२ तासात कसं पोहचता येईल हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवूनही आम्ही महामार्गांची निर्मिती करत आहोत असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दिल्ली ते मुंबई हा महामार्ग ७५ टक्के पूर्ण झाला आहे ज्या ट्रकला ४८ तास लागत होते ते अंतर या मार्गामुळे जास्तीत जास्त १६ तासांवर येणार आहे. त्यामुळे फेऱ्या वाढतील. निर्यातीवर आपल्याला भर देता येणार आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

आपच्या उदयाबाबत नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
माझी फिलॉसॉफी वेगळी आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. ज्या व्यक्तीला जसं काम करायचं आहे करूद्या. मी माझ्या फिलॉसॉफीवर विश्वास ठेवतो. दोन रेषा वाढवण्याचे दोन मार्ग असतात एक तर दुसऱ्याची रेष पुसून टाकायची म्हणजे आपण आपली रेषच राहते. दुसरा मार्ग असतो आपली रेष मोठी करण्याचे ज्यामुळे आपोआपच आपण सकारात्मकरित्या जिंकतो. माझा विश्वास सकारात्मकतेवर जास्त आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे. आमचा अजेंडा विकास आहे. जर आम्ही चांगलं काम केलं तर लोक आम्हाला निवडतील. जर लोकांनी नाकारलं तर सशक्त विरोधी पक्ष म्हणून बसू. आपण आपल्या सकारात्मकतेवर विश्वास ठेवायचा असतो. इतर कुणाबाबत मी भाष्य करणार नाही असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

प्रमोद महाजन आणि मॅचचा किस्सा
मी स्वतः या गोष्टीव विश्वास ठेवतो की क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. एकदा आम्ही प्रमोद महाजन यांच्यासोबत मॅच पाहण्यासाठी ब्रेबॉन स्टेडियमला गेलो होतो. प्रमोद महाजन हे तेव्हा निवडणूक हारले होते. त्यामुळे ते आमच्यासोबत मॅच पाहण्यासाठी आले होते. मात्र तेव्हा भारताच्या विकेट जाऊ लागल्या. त्यानंतर नाराज झालेले प्रमोद महाजन आम्हाला म्हणाले की मी जातो तिथे हारच दिसते. मी त्यामुळे आता घरी जातो. प्रमोद महाजन यांना आम्ही सांगितलं की तुम्ही जात असाल तर जा आम्ही मॅच शेवटपर्यंत पाहणार. ते घरी गेल्यानंतर आम्ही मॅच पाहू लागलो आणि काय आश्चर्य प्रमोद महाजन घरी गेल्यानंतर भारताची बाजूच पलटली आणि आपण ती मॅच जिंकलो. राजकारणातही असंच असतं कोण का जिंकला आणि कोण का हरला? हे सांगता येत नाही. जनतेचा निर्णय स्वीकारायचा असतो असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You need to work for those who voted for you also for those who didnt this is democracy said nitin gadkari scj
First published on: 30-12-2022 at 12:35 IST