गायन कलेमध्ये रागाची बांधणी हे स्वर, लय, ताल या साधनांनी इमारत उभारण्यासारखेच कौशल्य आहे. ख्याल, राग आणि बंदिश हे गायनाचे साधन आहे, तर दृश्य माध्यम, स्थापत्य आणि दागिने घडणीतील नक्षीदार कलाकुसर करून केलेली रागमांडणी हे साध्य आहे. त्यामुळे रागसंगीत हे एक प्रकारचे स्थापत्यशास्त्रच आहे, असे मत जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गानवर्धन आणि ललित कला केंद्राचे भीमसेन जोशी अध्यासन यांच्यातर्फे आयोजित मुक्त संगीत चर्चासत्रात ‘रागसंगीताची संकल्पना’ या विषयावर चैतन्य कुंटे आणि गीतिका वर्दे-कुरेशी यांनी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याशी संवाद साधला. कुंटे यांच्यासह भरत कामत यांनी त्यांच्या सादरीकरणाला साथसंगत केली. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या हस्ते रागेश्री वैरागकर यांना डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार, धनश्री फडके-नाखे यांना पं. शरद सुतवणे स्मृती पुरस्कार आणि स्वानंदी सडोलीकर यांना सरला कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर, संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी या वेळी उपस्थित होते. देशपांडे म्हणाल्या, साचेबद्ध चौकटीमध्ये ठराविक व्याकरणानुसार राग ‘उभा’ राहिला असे कलाकाराला वाटत नाही. त्यासाठी अमूर्त ध्वनीला मूर्त करण्याचा प्रयत्न होतो. त्या मूर्तावर लक्ष केंद्रित करूनच अमूर्ताचा प्रवास सुरू होतो. मूर्त स्वरूप म्हणजे समोर बसलेला प्रेक्षक आणि अमूर्त स्वरूप म्हणजे ईश्वराप्रती जाणे. कलाकाराने सादरीकरणामध्ये दोन्ही टोकं गाठणे घातक असते. त्यामुळे या दोन्हीचा समतोल साधता आला पाहिजे. गाणं कानाला चांगले वाटले पाहिजे, बुद्धीला कळलं पाहिजे, मनात रुजलं, ते मुरलं आणि झिरपलं तर त्याचा आनंद अधिक असतो. त्यांनी ‘सावनी’ आणि ‘केदार’ रागातील बंदिशी, टप्पा, ठुमरी गायन केले.