‘‘आताचे शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करून तिचे पाठांतर करणे. पण जोपर्यंत जीवनाचा बोध प्राप्त होत नाही, तोपर्यंत व्यक्तीने मिळवलेल्या ज्ञानाला ज्ञान म्हणता येणार नाही. आपण खरेच शहाणे आहोत की नुसतेच पढतमूर्ख, हे जाणून घेण्यासाठी सुशिक्षितांनी दासबोधातील ‘मूर्खाची लक्षणे’ जरूर वाचावीत!,’’ असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. ‘श्री रामदासी स्वामी संस्थान’तर्फे अरविंद ब्रrो यांनी लिहिलेल्या ‘दासबोध दशकसार - मानवी मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाचे रविवारी डॉ. भटकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी भटकर बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष भूषण स्वामी, व्यवस्थापन सल्लागार विजय ठोंबरे, सज्जनगड येथील व्यवस्थापक मोहनबुवा रामदासी या वेळी उपस्थित होते. भटकर म्हणाले, ‘‘व्यवस्थापनाच्या अभावामुळेच समाज विस्कळीत असल्याचे दिसते. ‘मी म्हणजे कोण’, या मूलभूत प्रश्नाचा समग्र विचार आणि मनाच्या व्यवस्थापनाचे मर्म दासबोधात सापडते.’’