"आपल्या पुण्यात ८ मार्च रोजी पहिले करोनाबाधित दांपत्य आढळले. जेव्हा मी त्या दोघांसोबत संवाद साधला. तेव्हा त्या पती पत्नीच्या बोलण्यातून चिंता आणि भीती जाणवली. त्यामुळे सुरुवातीला दोघांकडून माहिती जाणून घेऊन, त्यांच्या मनातील भीती दूर करून सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. कोणताही आजार असो, सकारात्मक राहिल्यास आपण त्यावर निश्चित मात करू शकतो. असा विश्वास, त्या दोघांमध्ये निर्माण केला. त्या १४ दिवसांच्या कालावधीत उपचाराना चांगली साथ दिली. त्यानंतर रुग्णालयातून दोघे बाहेर पडताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून समाधानी झालो," अशी भावना पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी व्यक्त केली. मागील चार महिन्यापासून नायडू रूग्णालयात करोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याचे काम पुणे महानगरपालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्यासह त्यांची टीम करीत आहे. 'डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. "आपल्या शहरात करोना विषाणूचा शिरकाव करून चार महिन्याचा कालावधी होत आला आहे. आज अखेर १५ हजाराच्या पुढे रुग्णसंख्या आणि ६०० हून अधिक मृतांची संख्या झाली आहे. तर १० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या काळात अनेक अनुभव येऊन गेले आहे. हा करोना विषाणू खूप काही शिकवून गेला आहे. त्यातील एक सांगायच झाल्यास, काही रुग्णांच्या घरात कोणीही नसल्याने आपले कसे होणार या विचारामध्ये अनेकांना पाहिले. तर उपचार सुरू असताना डोळ्यासमोर रुग्णांचा मृत्यू पाहून खूप वाईट वाटत होतं," हे सांगत असताना डॉ. वावरे यांचा कंठ दाटून आला. तसेच ते पुढे म्हणाले की, "एखाद्या व्यक्तीला करोना झाल्यास समाजातील प्रत्येक व्यक्तीने कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे, कारण आपल्या कुटुंबातील व्यक्तीला हा आजार झाल्याने खचून जातात." "या काळात त्यांच्या सोबत राहण्याची गरज आहे. तसेच बाधित रुग्णांनी घाबरून जाऊ नये, कायम सकारात्मक राहावे," असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.