आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधिर मुलांच्या मागण्या ऐकून न घेता त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या सरकारला या मुलांचा शाप लागेल अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य शासनावर सडकून टीका केली. तसेच तुमच्या मागण्या मी स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असे आश्वासनही त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. पुण्याच्या समाज कल्याण कार्यालयासमोर आज सकाळपासून मूकबधिर मुलांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, यावेळी उपस्थित हजारो मुलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांच्या या कृतीचा राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले, मुलांना मारहाण करणं दुर्दैवी आहे, या मुलांचा सरकारला शाप लागेल. ज्यांनी यांना मारण्याचा आदेश दिला त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजनामा घ्यावा. राज म्हणाले, सरकारला तरुणांच्या मागण्यांशी काही घेणं देण नाही. सरकारचा फक्त खाबूगिरीवर भर आहे. आता या सरकारला पहिल्या सरकारवर टिका किंवा आरोप करण्याचा अधिकार राहिलेला नाही. या आंदोलनकर्त्यां मुलांच्या कोणत्याही मागण्या चुकीच्या नाहीत. त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे. दरम्यान, या मूकबधिर आंदोलनकर्त्या मुलांनी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले आहे.