पुलवामा घटनेत पती शहीद झाल्याची माहिती मिळाल, तेव्हा सर्व संपल्यासारखे वाटले होते. पण त्यानंतर दोन्ही मुलींकडे पाहिल्यावर जगण्याची नवी उमेद मिळाली. आता दोन्ही मुलींना खूप शिकवणार आणि त्यांना देशसेवेसाठी सीआरपीएफमध्ये पाठवणार असल्याची भावना शहीद प्रदीप सिंह यादव यांच्या पत्नी नीरजदेवी यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
उत्तर प्रदेशातील कनोज येथील असलेल्या नीरजदेवी यादव म्हणाल्या की, आज देखील सीमेवर दहशतवाद्यांकडून कुरघोडी करण्याचे प्रकार चालू आहे. यात अनेक जवान जखमी आणि शहीद होत आहे. सरकारने विशेष पावले उचलून दहशतवाद मुळासकट नष्ट करावा. त्यानंतरच सीमेवर शांतता राहण्यास ख-या अर्थाने मदत होईल. तसेच, पती शहीद झाल्यापासून आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाने आमच्या परिवाराला आधार देण्याचा काम केले आहे. या सर्वांची मी कायम ऋणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यातील १७ शहिदांच्या कुटुंबियांना पुणे सराफ असोसिएशन यांच्या वतीने प्रत्येकी एक लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी पुणे सीआरपीएफचे डेप्युटी डीआयजी बिरेंद्र कुमार टोप्पो आणि पुणे सराफ असोसिएशनचे फत्तेचंद रांका तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.