|| चिन्मय पाटणकर
पालकांच्या निग्रहामुळे शिक्षणक्षेत्रात बदलाचे नवे वारे
मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत आहे, इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, अशा चर्चा सातत्याने होत असताना अलीकडे पालक मराठी माध्यमाच्या शाळेला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवत असल्याचा नवा कल दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांत दोन लाख पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांतील शाळांमधून काढून मराठी माध्यमांच्या शाळेत टाकल्याची आकडेवारी आहे.
शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे की मराठी, हा मोठा चर्चेचा विषय आहे. जागतिक पातळीवर इंग्रजीचाच बोलबाला आहे. त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले, तरच ती त्या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊ शकतील अशा समजुतींसह फॅशन म्हणून कित्येक पालक मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश करून देतात. गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्याबरोबरच मराठी माध्यमाच्या शाळांची संख्याही पुरेशा पटसंख्येअभावी कमी झाली. मात्र आता हे चित्र बदलत आहे. मुलांना इंग्रजी माध्यमात शिकताना येणाऱ्या अडचणी, मुलांवरचे वाढते दडपण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. सध्या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना हा नवा कल दिसून येत आहे.
समीर खडकीकर यांनी आपल्या दोन्ही मुलांना पोद्दार इंटरनॅशल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मा. स. गोळवलकर गुरुजी या मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे. इंग्रजी माध्यमातून काढण्याबाबत ते म्हणाले, ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अभ्यासक्रमाशिवाय इतर उपक्रमांवर जरा जास्तच भर दिला जातो. त्याचा अभ्यासाशी काहीही संबंध नसतो. विविध प्रकल्पांच्या नावाखाली सततचा खर्च होत असतो. ते अजिबात परवडत नाही. मुख्य म्हणजे शिक्षकांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण मोठे असते.
त्याचा मुलांवर, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. इंग्रजी माध्यमात शिकणे मुलांना अवघड जाते. पालक म्हणून त्यांचा अभ्यास घेणेही कठीण झाले होते. या सगळ्याचा मुलांवर परिणाम होत असल्याचे जाणवले. म्हणून मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला.’
कारण काय?
इंग्रजी माध्यमात शिकणे मुलांना अवघड जात असल्याने पालकांचा मराठी माध्यमाकडे ओढा वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. मूलभूत मराठीही नाही आणि धड इंग्रजीही नाही अशा अवस्थेमधील पाल्याची शैक्षणिक अवस्था पाहून पालक त्यांना मराठी माध्यमांतील शाळांमध्ये घालत आहेत.
अनेक विद्यार्थ्यांच्या घरी मराठी वातावरण असते. घरात मराठी संवाद आणि शाळेत इंग्रजी माध्यम हे मुलांना कळत नाही. अनेक पालक आपल्या पाल्याची कुवतच ओळखत नाहीत. त्यामुळे मुलांची ओढाताण होते. त्यांना इंग्रजी माध्यम झेपत नाही. त्यांच्यावर मानसिक दडपण येते. त्यामुळे बरेच पालक आता आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमासाठी प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आले आहे. – कल्पना धालेवाडीकर, मुख्याध्यापिका, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय
राज्यभरात इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमाकडे वळलेल्या मुलांची गेल्या चार वर्षांतील संख्या दोन लाखांहून अधिक आहे. पुण्यातही अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. येत्या काळात हे प्रमाण वाढतच जाणार आहे. – अनिल गोरे, मराठी माध्यम चळवळीचे प्रचारक