काही अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं वृत्त निराधार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. “मी असं काहीही बोललेलो नाही, माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आलं आहे,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पुण्यात पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

देशमुख म्हणाले, “लोकमत वृत्तपत्रानं माझं वक्तव्य म्हणून जी बातमी छापली, ती निराधार आहे. माझ्या तोंडामध्ये तसं व्यक्तव्य टाकण्यात आलं आहे. मी असं कुठेही म्हटलेलो नाही. जर आपण यासंदर्भातील युट्यूबर असलेला माझा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येईल.”

चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यात एका अतिवरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. मात्र, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले गेले, असं गृहमंत्री देशमुख बोलल्याचं वृत्त लोकमतला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. त्यावरुन आज पुण्यात पत्रकारांनी देशमुख यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी याचा इन्कार केला.

संबंधित वृत्तानुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदारांना तुमच्या फायली आमच्याकडे आहेत अशा शब्दांत धमकावणे, त्यांना राजीनामा द्यायला सांगणे असे प्रकार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अनिल देखमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चेनंतर हे प्रकरण योग्य प्रकारे मार्गी लावण्यात आलं, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध झाले होते.

शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना ६५ लाखांची मदत

करोनाच्या काळात मागील सात महिन्यांत पोलिसांनी खूप काम केले आहे. आमचे पोलीस जरुर थकले आहेत पण हिम्मत हारलेले नाहीत. या काळात कर्तव्य निभावताना २०८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले आहेत. दरम्यान, या शहीद पोलिसांच्या कुटुंबाला ६५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिली.