रिक्षाची भाढेवाढ झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करण्यात येणारे बदल (कॅलिब्रेशन) करून घेण्यास देण्यात आलेली शेवटची मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यानंतर मात्र कॅलिब्रेशनशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांवर ‘आरटीओ’कडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १५ ऑक्टोबरला रिक्षाला भाडेवाढ दिली. भाडेवाढीबरोबरच या वेळी रिक्षाचा पहिला टप्पा एक किलोमीटरवरून दीड किलोमीटरचा करण्यात आला. त्यामुळे रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्याचा विषय आला. मात्र, सुरुवातीपासून कॅलिब्रेशनबाबत विविध वाद निर्माण झाल्याने अनेक रिक्षा चालकांनी कॅलिब्रेशनच्या प्रक्रियेकडे पाठ फिरविली होती. सुरुवातीला कॅलिब्रेशन करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली. या मुदतीतही अनेक रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन न झाल्याने ही मुदत एक महिन्याने वाढविण्यात आली.
वाढीव मुदत ३१ डिसेंबरला संपली. मात्र, दुसरी मुदत संपूनही आठ ते दहा हजार रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओने दिलेल्या आकडेवाडीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ दिली. ही मुदत १० जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर कॅलिब्रेशनशिवाय रिक्षा रस्त्यावर धावल्यास कारवाई होणार आहे.