पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांत मिळून एकूण ९७.४१ टक्के म्हणजे २८.३९ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ९९.८३ टक्के म्हणजे २९.१० अब्ज घनपूट पाणी धरणसाखळी प्रकल्पात होते, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून या धरणातून मुठा नदीत २ हजार १४० क्युसेक वेगाने सोडण्यात येत असलेले पाणी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. चारही धरणांत २८.३९ अब्ज घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे.

हेही वाचा – पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

हेही वाचा – पुणे : पीएमपीची आता कॅशलेस तिकीट सुविधा; सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या चारही धरणांत मिळून एकूण २८.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण ७९.६२ टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून ४५० क्युसेकने, तर खडकवासला धरणातून २ हजार १४० क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरण परिसरात १ मिलीमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ मिलीमीटर तर वरसगांव आणि टेमघर धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी २ मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.