पिंपरी-चिंचवड : आई रागावली म्हणून १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीत घडली आहे. विशाल जनार्दन चौधरी (वय- १४ रा. आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. विशालला लहान बहीण असून त्याचे तिच्याशी भांडण झाले होते. आईने विशाल आणि लहान मुलीला समजावून सांगून चापट मारली आणि दोघांना रागावले. याच रागातून विशालने थेट टेरेसवर जाऊन गळफास घेत आपले जीवन संपवले.
हेही वाचा – मिरची झाली ‘चिखट’; मिरचीच्या दरामध्ये ५० वर्षांतील उच्चांकी भाववाढ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा आई आणि दोन लहान भावंडांसह आकुर्डीत राहायला आहे. वडील हे कामानिमित्त दुबईत असतात. तिन्ही मुलांची काळजी आई घेत असते. आज सकाळी अकराच्या सुमारास विशाल आणि लहान बहीण यांच्यात भांडण झाले होते. आईने लहान मुलीला आणि विशालला रागावून, समजावून सांगितले आणि एक चापट मारून जेवायला चल, असे विशालला म्हटले. विशाल जेवायला आला नाही. तो टेरेसवर गेला आणि त्याने गळफास घेतला. विशाल का आला नाही म्हणून आईने लहान बहिणीला त्याला शोधण्यास सांगितले. तेव्हा तो लटकत असलेल्या अवस्थेत होता. दिसलेले दृश्य मुलीने आईला सांगितले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तातडीने इतर एका व्यक्तीच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे चौधरी कुटुंबात शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.