पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ९१ शाळांमध्ये ८६२ कॅमेरे बसविण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात ९० शाळांमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठी चार कोटी रुपयांच्या पूर्वगणनपत्रकाला नुकतीच मान्यता देण्यात आली.

मुंबई, बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनीवर काही महिन्यांपूर्वी अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिला होता. शहराच्या विविध भागांमध्ये, तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये मिळून पुणे महापालिकेच्या सुमारे ३०० शाळा आहेत. या सर्व शाळांंमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.

या शाळांचे शिक्षण विभाग, विद्युत विभागाने एकत्रित सर्वेक्षण केले होते. यामध्ये शाळेच्या इमारती किती आहेत, त्यामध्ये खोल्यांची संख्या किती आहे, एकूण मजले किती, मोकळी जागा यांसह प्रवेशद्वारे यांची पाहणी केली होती. त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर या सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या ९१ शाळांमध्ये ८६२, दुसऱ्या टप्प्यात आणखी ९० शाळांमध्ये ४ कोटी रुपये खर्च करून कॅमेरे बसवले जाणार आहेत. उर्वरित १५० शाळांमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम शिल्लक राहणार आहे. हे देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार असल्याची माहिती विद्युत विभागप्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

मुलींच्या शाळांना प्राधान्य

मागील काही वर्षांपासून खासगी तसेच शासकीय शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये तेथे काम करणारे कर्मचारी, शिक्षक, बसचालक यासह अन्य लोकांकडून मुलींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यात प्राधान्याने सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुलींच्या शाळांची निवड केली आहे. मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यावर चर्चा केली जाते. मात्र काही दिवसांनी या घटनांचा विसर पडतो.

गैरप्रकारांवर लक्ष ठेवणे शक्य

शहरात पुणे महापालिकेच्या ३०० हून अधिक शाळा आहेत. सुमारे दीडशे इमारतींमध्ये या शाळा भरतात. काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक असले, तरी त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे या शाळांच्या परिसरातच कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरणे, मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपींचा त्रास असतो. हे प्रकार रोखण्यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.