लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्य मंडळाने बारावी आणि दहावी या दोन्ही परीक्षांचे निकाल गेल्यावर्षीपेक्षा लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. त्या प्रमाणे बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही त्यास दुजोरा दिला. आणखी वाचा-सीएनजी टंचाईने पुणेकरांचे हाल! रांगेत तब्बल आठ तास थांबण्याची वाहनचालकांवर वेळ दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. त्यात राज्य स्तरावरून भरारी पथकांची नियुक्त करण्यात आली होती. तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांची संख्या घटली, तर दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. यंदा बारावीच्या निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल किती टक्के लागणार, गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल वाढणार का, या बाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.