नियमानुसार काम करा, चुकीच्या कामांना थारा देऊ नका, काळानुसार बदल करण्याचे धोरण ठेवा, असे बजावतानाच अधिकाऱ्यांनी ‘हो’ म्हणायला तर लोकप्रतिनिधींनी ‘नाही’ म्हणायला शिका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आयुक्तांनी नियमानुसार काम करतानाच सकारात्मक भूमिका ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पिंपरी पालिकेतील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अजितदादांच्या उपस्थितीत पुण्यात शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी विकास देशमुख, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, शहराध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम आदी उपस्थित होते. चार तास चाललेल्या या बैठकीत अनधिकृत बांधकामे, मेट्रो, मोनोरेल, पाणीपुरवठा, घरकुल योजना, पुनर्वसन प्रकल्प, रस्तेउभारणी, बसस्टॉप, टीडीआर आदी विषयांचा अजितदादांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत नगरसेवकांनी समस्यांचा पाढा वाचला. आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारीही केल्या. ८० टक्के जागा ताब्यात असेल तरच कामाला सुरुवात करण्याची आयुक्तांची भूमिका अजितदादांनी अमान्य केली. रस्तारुंदीकरणात ज्यांची घरे बाधित झाली, त्या बेघरांना घरे देण्याचा निर्णय झाला.