पुणे : बाणेर येथील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीला होत असलेल्या विलंबावरून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करून महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची चांगलीच कानउघाडणी केली. ‘निधी दिला, सूचना केल्यानंतरही कामे होत नाहीत. तुम्ही ३१ मे रोजी निवृत्त होणार आहात ना? तरीही तुमची बदली करीन. मी मुंबईला जाण्यापूर्वी बदलीचा आदेश आला असेल,’ अशा शब्दांत पवार यांनी आयुक्तांना सुनावले. बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १६५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या सद्य:स्थितीबाबतची विचारणा पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

‘जागेवरील राडारोडा काढून जागा अद्याप मोकळी झालेली नाही,’ अशी माहिती आयुक्तांनी बैठकीत दिली. त्यामुळे पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मुख्यमंत्री, मी आणि एकनाथ शिंदे यांनी सांगूनसुद्धा महापालिकेकडून बाणेर येथील जागेवरील राडारोडा उचलला नाही. त्यामुळे फुकट निधी मिळत असूनही प्रकल्प मार्गी लागत नाही. मग त्याचा फायदा काय? त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तीन दिवसांत त्या जागेवरील राडारोडा उचला. तीन दिवसांनंतर सकाळीच सात वाजता येऊन मी प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहे,’ असे पवार म्हणाले. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राजवळील शासन आणि महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा ठेवून जागा बळकाविण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारी पाण्याची गळती दुरुस्त करता येत नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावरून यापूर्वीच पवार यांनी महापालिकेला सूचना केली होती. त्या संदर्भात पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची बाब राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली. त्यावरही पवार यांनी आयुक्तांना खडे बोल सुनावले.

टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिलेले १६५ कोटी रुपये आणि भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी महापालिकेच्या उपलब्ध करून दिलेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीवरून पवार यांनी आयुक्तांना धारेवर धरले. ‘अतिक्रमणांकडे वेळीच लक्ष घातले पाहिजे. कालांतराने हा मुद्दा भावनिक होतो. त्याचे पडसाद राज्यभर उमटतात. कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जबाबदार अधिकारी म्हणून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

‘निधी योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे’

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक आमदारांनी महापालिका आयुक्तांविषयी तक्रारी केल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांना कामकाज सुधारण्याची सूचना केली. या संदर्भात बैठकीनंतर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर ‘बैठकीत काय झाले हे सांगण्यासाठी मी बांधील नाही. जी गोष्ट माझ्या अखत्यारित होती, ती मी केली. निधी योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे. अधिकाऱ्यांनीही त्याला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे,’ असे पवार यांनी सांगितले.