मागील काही वर्षात राज्यात बऱ्याच राजकीय उलथापालथी बघायला मिळाल्या. याच काळात अनेक राजकीय पक्ष फुटले, तसेच अनेक नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याचं बघायला मिळालं. पण आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलच तापलं आहे. अशात पुण्यातील राजकीय बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

‘जागृत पुणेकर’, या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनर्समध्ये पाच वर्ष पक्ष सोडणार नाही असं आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच आपलं मत द्या, अस आवाहन करण्यात आलं आहे. जुन्या पुणे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – “वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्…

बॅनर्सवरील नेमका मजकूर काय?

जागृत पुणेकरांनो, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना आपल्या परिचय पत्रात एकच उल्लेख करावा, की ”मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,” जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिन त्यांनाच मतदान करा, असा मजकूर या बनर्सवर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान सजग नागरिक मंचाचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी प्रतिक्रिया दिली. या बॅनर्स कोणी लावले, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, या बॅनर्समधील मजकुरांशी आम्ही सहमत आहोत. यावरून जनतेच्या मनात नेत्यांविरोधात नाराजी आहे, हे दिसून येते. लोकांना पक्ष आणि पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहणारा उमेदवार हवा आहे, हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सह…

महत्त्वाचे म्हणजे असे बॅनर्स लावताना लोकांनी त्यांचे नाव गुपीत ठेऊ नये, पण हे बनर्स लावणाऱ्यांचे नाव गुपीत ठेवण्यात आले आहे. यावरून लोकांच्या मनात भीती आहे, हे दिसून येते. खरं तर हे योग्य नाही. लोकांनी राजकारण्यांना का घाबरावे?, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सजग नागरिक मंचाचे आणखी एक कार्यकर्ते विहार दुर्वे यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. देशात मोठ्या प्रमाणात पक्षांतरं घडत आहेत, हे मुख्यतः तपास यंत्रणांच्या भीतीमुळे होत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित करायला हवी, असे ते म्हणाले.