पुणे : चाकण परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. याचबरोबर चाकण शहरात पर्यायी बाह्यवळण मार्ग तयार केला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी दिले.

पुणे परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक डॉ. म्हसे यांनी घेतली. या बैठकीत प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. ते म्हणाले की, पुणे शहरासह इतर काही भागांत सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचबरोबर वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात तातडीने मोजणी करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा.

या बैठकीत नाशिक फाटा ते राजगुरुनगर या मार्गावरील उन्नत मार्गासाठी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, चाकण (ता. खेड) या गावातील मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्य वळण रस्ते तयार करण्याबाबत चर्चा झाली. मुळशी तालुक्यातील बालेवाडी ते शेडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे – माण यासह इतर मार्गावरील भूसंपादन प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला. नवले पूल भागातून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, सहआयुक्त हिम्मत खराडे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांचे लक

चाकण औद्योगिक क्षेत्रासह या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना शासकीय यंत्रणांना दिल्या होत्या.