पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नारंगी इशारा दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाटसदृश वातावरणाचा इशारा कायम आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता आहे. नगर आणि नाशिकला अवकाळी पावसासाठी नारंगी इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोर राहणार आहे. शिवाय तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग जास्त राहून पडझड आणि नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – खरीप हंगामासाठी मुबलक खते… राज्याला किती खत मिळणार?

हेही वाचा – केरळमध्ये कधी दाखल होणार मोसमी वारे? हवामान विभागाने दिली माहिती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबी समुद्रातून बाष्पयुक्त हवा राज्यात येत आहे. त्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. स्थानिक पातळीवर तापमान वाढून ढगांची निर्मिती होत आहे. ज्या भागात जास्त उंचीचे ढग तयार होत आहेत, तिथे गारपीट होत आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.