स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. ठाकरे चूक सुधारत असले तर आनंदच आहे. सत्तेच्या मोहापायी त्यांनी काँग्रेसबरोबर जुळवून घेतले, अशी टीप्पणी पाटील यांनी केली.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकेशी सहमत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत केले.
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानासंदर्भात काँग्रेसला नेहमीच अनादर आहे. काँग्रेस नेत्यांनी सावरकर यांच्याबाबत जेव्हा-जेव्हा वादग्रस्त विधाने केली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचा समाचार घेतला. गेल्या काही काळात उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी तडजोडीची भूमिका स्वीकारली. मात्र आता त्यांनी काँग्रेस नेत्यानी केलेल्या विधानाशी असहमती दर्शविण्याच्या कृतीचे आणि सावरकरांबाबत श्रद्धा असलेल्या भावनेचे स्वागत करतो. हिंदुत्वाच्या संबंधित आगामी काळात ठाकरे यांनी अशीच भूमिका घेतली तर सामान्य माणासालाही आनंद होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, की आता आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत. एकत्र येण्याची आम्हाला काहीही आवश्यकता नाही. काँग्रेसची मतपेटी उद्धव ठाकरेंची कधीच नव्हती. मात्र, सत्तेच्या मोहापायी त्यांनी ते जळवून घेतले; पण आता या वेळेस जर त्यांना कळत असेल की आपली मोठी चूक झाली. याचा अर्थ त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन केली पाहिजे असा होत नाही.