गणेश यादव, लोकसत्ता

पिंपरी : चिंचवड, पिंपरी, मावळमधील बूथ प्रमुख फोन उचलत नाही. निम्मे पन्नाप्रमुख गायब आहेत. चिंचवडमध्ये केवळ तीन, पिंपरीत १५ आणि मावळमध्ये १७ लोकांनी नुकतीच झालेली ‘मन की बात’ बघितली. मग कसा व्हायचा महाविजय? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. आजपासून पक्षातील गटबाजी संपविण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पिंपरी, चिंचवड, मावळमधील वॉरियर्सला मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. पिंपरीत आमदार उमा खापरे, विधानसभाप्रमुख अमित गोरखे राहत आहेत. या मतदारसंघात केवळ दोन हजार घरांचे समर्थन मिळाले आहे. अशाने महाविजय होईल का, पक्षाच्या कामाची वॉर रुममधून मी दररोज माहिती घेत आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडकरांना २०२५ मध्येच दररोज पाणीपुरवठा?

खासदार, आमदार, नगरसेवक, अध्यक्ष, महिला अध्यक्ष कोण होणार याच्यातच आपल्याला रस असतो. त्याची चर्चा केली जाते. पण, गुजरातमध्ये भाजपकडून कोण खासदार, आमदार होणार हे कोणालाच माहिती नसते. दररोज दहा घरांना भेटी दिल्या पाहिजेत. पक्षाचे केलेले काम सरल उपयोजनावर पाठवावे. जो माहिती पाठवेल, त्यालाच महापालिकेची उमेदवारी मिळेल. आजपासून गटबाजीचे राजकारण संपवून टाका, नेत्यांनी गटबाजी संपवली तरच महाविजय पूर्ण होईल. पिंपरी-चिंचवडमधील एकही मत दुसरीकडे गेले नाही पाहिजे. त्यासाठी १३ महिने दररोज तीन तास काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अश्विनी जगताप यांना डावलण्याचा प्रयत्न करू नये’

भाजप संघटना कधी लोकप्रतिनीधींना डावलत नाही. अश्विनी जगताप आमदार आहेत. त्यांना कोणी डावलू शकत नाही. डावलण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही. कारण लोकप्रतिनिधी आमच्या संघटनेचा गाभा आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही बावनकुळे म्हणाले.