पिंपरी : ‘माजी मंत्री धनंजय मुंडे यांंच्या परळीतील कार्यालयात खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले. मात्र, मुंडे यांना सहआरोपी करण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना वाचविले,’ असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी केला.

‘संतांची भूमी असलेला बीड जिल्हा बदनाम झाला आहे. राजकीय स्वार्थासाठी गुंड टोळ्यांच्या माध्यमातून खून केले जात आहेत. सत्तेतून पैसा, संपत्ती कमावणे, त्यामुळे बीड जिल्ह्यात नागरिकांना त्रास झाला आहे. हे थांबविण्यासाठी समाजाने खोट्याला खोटे म्हटले पाहिजे. शासनाने खोट्याची पाठराखण करू नये, अशी अपेक्षा होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय पाठबळामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंंडे यांना वाचवले आहे. त्यामुळे सहआरोपी करण्याची मागणी करणे बंद करावे लागले आहे,’ असे जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वाल्मीक कराडचा एन्काउंटर करण्याची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. त्याबाबत जरांगे म्हणाले, ‘तपासात सत्य पुढे येईल. त्याबाबतची सविस्तर माहिती नाही. वाल्मीक कराडचा २० वर्षे वापर केला. अनेकांच्या हत्या केल्या, पैसे कमविले, आता मारून टाकावे, असे धनंजय मुंडे यांना वाटले असेल. जे काही आहे, ते तपासात निष्पन्न होईल.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणबी नोंद सापडलेल्या लोकांना अधिकारी जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे देत नाहीत. अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय शक्ती असली, तरी त्यांना घरी बसविल्याशिवाय शांत बसणार नाही. – मनोज जरांगे