उन्हाळी सुटी संपता संपता बालकलाकारांच्या अभिनय कौशल्यातून सादर झालेली तीन बालनाट्ये म्हणजे आबालवृद्धांसाठी पर्वणीच ठरली. घरादारासाठी उपयुक्त अशा विषयांचे सादरीकरण पाहताना मुलं हरखून गेली. वाचन ही जशी कालची गरज होती, तशीच ती आजचीही गरज आहे. ‘मोबाइल गेम’मध्ये रमण्यापेक्षा वाचनामध्ये रमल्यास त्याचे फायदेच अधिक असतात, हे पुन:पुन्हा सांगावे लागते. स्क्रीन टाइम कमी करा, हे केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही सांगण्याची गरज अधोरेखित केली होती ‘अदृश्य खजिना’ या नाटकामध्ये. विविध विषयांच्या पुस्तकांतील पात्रे प्रत्यक्ष रंगमंचावर जेव्हा येतात, तेव्हा येणारी गंमत अनुभवण्याची ही संधी दिली ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ने. ‘अदृश्य खजिना’ या नाटकातून पुस्तके हाच कसा खरा खजिना आहे, हे अंजली दप्तरदार यांनी अत्यंत समर्पकपणे सांगितले. या नाटकाचे दिग्दर्शन श्रीशैल शेलार यांचे होते.

एका बाजूला हा संदेश, तर दुसऱ्या नाटकात पालकांची कानउघाडणी होती. संध्या कुलकर्णी यांच्या लेखनातून साकारलेल्या या नाटकाचे ‘कठपुतली’ हे नाव जेवढे चपखल होते, तेवढाच कठपुतळ्यांचा हुबेहुब अभिनय करणाऱ्या दोन बालकलाकारांची पेशकश. त्यांनी उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांच्या वेशभूषा, रंगभूषा यांवर घेतलेली मेहनत, उत्तम लेखन आणि मुलांना कठपुतळ्यांसारखे नाचवू नका, हा उद्बोधक संदेश हे नाटक नकळत देऊन गेले. या नाटकाचे दिग्दर्शन होते प्रसाद कुलकर्णी यांचे. दोन्ही नाटकांसाठी नेपथ्यकाराची भूमिका सक्षमपणे पार पाडली पुष्कर देशपांडे यांनी.

‘नाट्यसंस्कार’चे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांच्या उत्तम संयोजनातून तीन वेगळे विषय आणि कसलेल्या बालकलाकारांकडून ही नाटके सादर झाली. जादूई दुनियेची जोड, नृत्य आणि दोन मुख्य बालकलाकारांच्या जीवनाशी निगडित, त्यांच्या स्वप्नपूर्तीशी संबंधित नाटक होते ‘स्वप्ने पहा पण…’. स्वप्नांच्या मागे धावताना त्या स्वप्नांची सहजतेने पूर्ती होताना आलेला अहंभाव किती घातक असू शकतो, याची झलक दाखविणाऱ्या या नाटकाचे लेखन सावनी केळकर यांनी केले होते. पल्लवी कुलकर्णी यांचे दिग्दर्शन, तर आरती दाते यांनी नेपथ्य साकारले होते.

आयुष्य सकारात्मक करताना

सकारात्मकतेची प्रत्येकालाच गरज असते. हीच सकारात्मकता जीवनात आनंद देण्याबरोबरच जीवनात सुखाची शिंपण करू शकते. पण सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांचे सातत्य गरजेचे असते. हे सातत्य टिकवण्यासाठी साहाय्यकारी ठरणारे जयप्रकाश झेंडे यांचे पुस्तक म्हणजे ‘आयुष्य सकारात्मक करताना.’ डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात लेखकाने कथांचा उपयोग करून घेतला आहे. या पुस्तकातील सकारात्मक कथा वाचकाला त्याच्यातील सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करतात.

सयी

सरला भिरूड यांच्या विखुरलेल्या आठणींचे कोलाज म्हणजे अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. गाव, शाळा, शिक्षण, गावातील आर्थिक विषमता अशा अनेक गोष्टी सांगता सांगता लेखिकेने केलेल्या कविता, त्यातून तिचे व्यक्त होणे आदी गोष्टी येतात. या पुस्तकात आठवणी देताना हे पुस्तक आठवणी कागदावर उतरविण्याच्या प्रयोगाबद्दल सांगून जाते. १८५ पृष्ठांच्या या पुस्तकातील लेखिकेच्या आठवणी वाचकाला अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करतात.

सदामुक्त

चंद्रपूर येथील लेखक प्रा. पुराणिक सदाशिव गोंगले यांचे ‘सदामुक्त’ हे आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या जीवन संघर्षाची कहाणी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे, त्यांनी पाहिलेल्या तसेच अनुभवलेल्या अनेकानेक गोष्टी वेळप्रसंगी ग्रामीण बाजातून त्यांनी या पुस्तकातून मांडल्या आहेत. बंदिस्त जगाशी दोन हात करण्याचा मार्ग म्हणजे संपूर्ण मुक्त होणे. इतके, की तुमचे अस्तित्व हीच एक बंडखोर वृत्ती ठरेल. ही वृत्तीही अनेक ठिकाणी त्यांच्या लेखनात डोकावते. जबाबदारीची जाणीव, वर्तमानातील उणिवांचे कठोर, सखोल परीक्षण करीत हे आत्मचरीत्र आकाराला आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shriram.oak@expressindia.com