पुणे : सकाळचे साडेअकरा वाजलेले, विमानांची नियमित उड्डाणे सुरू असताना टर्मिनलवर अचानक सुरू होतो चित्रपटातील कथानकाप्रमाणे थरार,११ वाजून ५० मिनिटांत संपूर्ण विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), बाॅम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणातील सुरक्षा अधिकारी, राज्य राखीव दलाचे पोलीस, स्थलांतर अधिकारी, विमान कंपन्यांचे पथक, अग्निशामक यंत्रणा आणि इतर सुरक्षा व्यवस्थेतील २५८ जवानांनी विमानतळाला छावणीचे रूप देतात.
अखेर बाॅम्ब नाशक पथकातील जवान सुरक्षात्मक कवच घालून सुसज्जतेने बाॅम्ब ठेवलेल्या दिशेने जातात. त्यांनी दहा मिनिटांनंतर बाॅम्ब निकामी झाल्याचे हात वर करून सांगताच सर्वाजण आनंद साजरा करतात. प्रवाशांना हा सारा प्रकार सुरक्षा व्यवस्थेनिमित्त झालेला एक सराव असल्याचे समजल्यानंतर ते सुटकेचा निःश्वास सोडतात.
ही सारी घटना होती विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेसाठी आणि त्यासाठी दहशतवादविरोधी आकस्मिक योजनेअंतर्गत सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
विमानतळाच्या टर्मिनलसह आजूबाजूच्या परिसरात ही सराव प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. तत्पूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी, हवाई दलातील सुरक्षा अधिकारी आणि विमानतळाचे संचालक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सराव प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत आढळून आलेल्या त्रुटींचा, व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंंतर्भाव करून सुरक्षा मानक कार्यप्रणालीत (एसओपी) अंतर्भाव करण्यात आला, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.
केंद्रीय सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत पुणे विमानतळाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासह सुरक्षात्मक यंत्रणांनी केलेल्या सरावातून समोर आलेल्या त्रुटींवर निरीक्षण नोंदवून त्यांचा सुरक्षा मानकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ