रस्ता ओलांडताना बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना एक कोटी नऊ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयात पार पडलेल्या लोकअदालतीत सुधीरकुमार बुक्के आणि ॲड. सुरेंद्र दातार यांच्या पॅनेलने दावा निकाली काढला.
तडजोडीसाठी अर्जदाराचे वकील ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी, गो डिजिट जनरल इन्शुरसन्सचे अधिकारी सुखप्रीत सिंग आणि ॲड. सुनील द्रवीड यांनी महत्वाची भूमिका बजावली. या घटनेत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती खडकीतील आर्मी बेस वर्कशाॅपमध्ये तांत्रिक होते. १ सप्टेंबर २०२१ रोजी मोशीतील सरदार चौकातून ते निघाले होते. रस्ता ओलांडत असताना त्यांना बसने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई यांनी ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी यांच्यामार्फ मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला.
बसमालक आणि विमा कंपनी असलेल्या गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात सत्र न्यायाधीश आणि मोटार अपघात न्याय – प्राधिकरणाचे सदस्य डी.पी.रागीट यांच्या न्यायालयात हा दावा दाखल झाला होता. पादचारी व्यक्तीचे वय ४८ वर्षे होते. त्यांना दरमहा ८० हजार रुपये वेतन मिळत होते. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. दावा दाखल केल्यापासून एका वर्षात निकाली काढण्यात आलेला आहे. पक्षकारांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान आहे, असे ॲड. पटणी यांनी सांगितले.