विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या याच पराभवावर भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टीका केली आहे. काँग्रेस पक्षाचं आता काय राहिलंय अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी मेट्रो स्थानकात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राणे सहभागी झाले. त्यांतर ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा>> एकनाथ शिंदे नॉट रिचेबल? शिवसेना नेत्या म्हणाल्या, “मला शंका आहे…”

“देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं काय राहिलं आहे? काँग्रेसची शक्ती कमी होत चालली आहे. ते केवळ बोलतात. त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. त्यांचे नेते, कार्यकर्ते देशात काम करत नाहीत. त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. एकनाथ शिंदे हे नॉटरीचेबल आहेत, ते कुठं आहेत असं सांगायचं नसतं,” असं नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा>> विधान परिषद निवडणूक : मतं फुटल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात म्हणाले, “होय…”

तसेच, “आज दिन आज 75 ठिकाणी साजरा झाला आहे. जनतेचं स्वास्थ चांगलं राहावं म्हणून हा योगा दिन साजरा केला जात आहे. योगासने केल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, अशी प्रतिक्रिया राणे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिली.

विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय झालं?

या निवडणुकीत काँग्रेसची सात तर शिवसेनेची तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अपक्ष आमदारांनी जर या दोन पक्षाच्या उमेदवारांना मतं दिली असतील तर शिवसेना, काँग्रेसची आणखी मतं फुटली असावीत. दहाव्या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र काँग्रेसच्याच दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली. या लढतीत काँग्रेसचे भाई जगताप निवडून आले. तर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला.