पुणे : निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने १२ ते १४ जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती केली जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.जोशी म्हणाले, ‘राज्यातील भाजप युती सरकार मतदानाचा चोरीचा पॅटर्न वापरून सत्तेवर आले आहे.
यावर प्रकाशझोत टाकणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वर्तमानपत्रात लिहिला. त्यामुळे भाजप नेते हादरले असून, या लेखाला उत्तर देणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख हा मूळ मुद्द्याला बगल देणारा आणि महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेखामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दलच आक्षेप घेतले आहेत. यावर निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असताना मुख्यमंत्री फडणवीस उत्तर का देत आहेत? त्यांच्या लेखामुळे निवडणूक घोटाळ्याबाबतचा संशयच बळावला आहे.’
‘निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेत बदल करत सरन्यायाधीशांना बाजूला केले आणि त्या जागी गृहमंत्री अमित शहा यांची नेमणूक केली. निवड समितीवर वर्चस्व मिळवले. मोदी यांच्या या डावपेचातूनच निवडणूक घोटाळ्याची सुरुवात झाली. याबाबत फडणवीस यांच्या लेखात अवाक्षरही का नाही,’ असा सवाल जोशी यांनी केला आहे.