राज्यात करोनाच्या पार्श्वभुमीवर असलेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. तसंच काही निर्णय ३१ मार्च २०२० पर्यंत झाले होते, पण आता आम्ही निर्णय घेतला आहे पुढचे आदेश निघेपर्यंत सर्व निर्णयाची अमलबजावणी सुरु राहील अशी माहिती यावेळी दिली. दरम्यान यावेळी पत्रकारांना पार्थ पवार यांचा उल्लेख करताच अजित पवार यांनी त्याचा बाप सांगतोय ना…असं आपल्या शैलीत उत्तर दिलं.

एका पत्रकाराने अजित पवारांना पार्थ पवार सिंगापूर येथून सुखरुप पोहोचले का असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात. तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही”. यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “आता मीच त्याचा बाप सांगतोय ना…पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी आहे” असं भन्नाट उत्तर दिलं.

आणखी वाचा- Coronavirus: “लग्न असो की दहावं-तेरावं, गर्दी कमी करा”; अजित पवारांचा गावरान सल्ला

लग्न असो की दहावं-तेरावं, गर्दी कमी करा –
“पुण्यात किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी दुख:द घटना झाल्यानंतर अंत्यविधी, दहावा, मग तेराव्याला गर्दी केली जाते. माझं जनतेला आवाहन आहे की, गर्दी टाळा. लग्नसमारंभ असेल तर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. काही कारणास्तव पुढे ढकलणं शक्य नसेल तर जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत पार पाडा. ग्रामीण भागात घरापुढे मंडप उभारुन लग्नं लावली जात आहेत. विधी कमीत कमी गर्दी करता कसे उरकता येतील याचा प्रयत्न करा,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.

आणखी वाचा- ३१ मार्च नाही पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल- अजित पवार

“महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ५२ असून एकाचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. मात्र आवाहन करुनही गर्दी टळली नाही तर मात्र ते बंद करावं लागेल,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.