पिंपरी : तरुणावर हल्ला केल्याने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून वाकड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची अटक बेकायदा ठरवून शिवाजीनगर न्यायालयाने त्यांची सुटका केली. त्यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी बुधवारी वाकड पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाजवळ आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला केला. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करीत असताना तरुणाने हात आडवा घातल्याने त्याच्या एका हाताचा पंजा पूर्णपणे तुटला. तर, एका हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर हवेत कोयता फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत आमचा कोणी नाद करायचा नाही’ असे बोलून आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार वाकड पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींना २३ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक केली. २४ तारखेला तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाकड पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवून आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना सोडून दिल्याचा आरोप करून नातेवाइकांनी पोलीस आयुक्तालयाबाहेर ठाण मांडले. तेथील अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना भेटू न देता सारवासारव करत पुन्हा वाकड पोलीस ठाण्यात पाठवल्याचा त्यांनी आरोप केला. या वेळी उपायुक्त विशाल गायकवाड यांनी जमावाची समजूत काढत आरोपींना पुन्हा अटक करणार असल्याचे आश्वासन दिले.
आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. मात्र, न्यायालयाने आरोपींना अटकेची कारणे कळवा, असे म्हणून अटक बेकायदा ठरवली आणि आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले. याबाबत न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. आरोपींना पुन्हा अटक केली जाणार आहे. – विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.