लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: भाविकांच्या अभंगगजरात बुधवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडआरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा भक्तिमय वातावरणात बीज सोहळ्याला अलोट गर्दी झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचे बीज सोहळ्याचे ३७६ वर्षे आहे. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली.

आणखी वाचा-राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?

सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले.