पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणे निम्म्याने भरली असून, चारही धरणात मिळून एकूण १५. ५६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ४६४ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणातून मिळून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चोवीस तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५८ मिलिमीटर, वरसगाव येथे ३९ मिलिमीटर तर पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे ३४ आणि ५ मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नसला तरी तो कायम असल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. धरण परिसरात पाऊस कायम असल्याने चारही धरणांमध्ये मिळून १५.५६ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा ४.३५ टीएमसी एवढा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.