पुणे : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे, आलेगावचे पुनवर्सनचे सरपंच नवनाथ झुंबर कदम, मुख्याध्यापिका अनिता खताळ, ग्रामसेवक अर्चना भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कुतवळ या वेळी उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगून पवार म्हणाले, भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, यासाठी राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडी-अडचणी येणार नाहीत, या बाबत दक्षता घेण्यात येत आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीने अध्यापन केले केले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरणविषयक संस्कार होण्यास मदत होईल या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.