जेजुरी : पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित रुंदीकरणामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप करीत जेजुरीतील बाधित कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे. बाह्यवळण मार्ग टाळून जेजुरी शहरातूनच होत असलेल्या रुंदीकरणाबाबतही आक्षेप घेतला जात आहे.
रामभाऊ शंकर काकडे, विमल म्हाळसाकांत खोमणे, आयुब मोहम्मद पानसरे, गणेश गोविंद खोमणे यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे. आम्ही बेघर होत असून आमच्यावरील अन्याय कोणीही दूर करत नाही म्हणून हा निर्णय घेत असल्याचे पत्रात म्हटले आहे. श्रीक्षेत्र जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने येथे कायम भाविकांची गर्दी असते. वास्तविक येथे बाह्यवळण रस्ता गरजेचा असताना तो रद्द करून जेजुरी शहरातूनच पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याबाबतही आक्षेप घेतला जात आहे. रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान न करता एकाच बाजूला उत्तरेकडील घरे आणि दुकाने पाडण्यात येणार असल्याने तेथील कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
सन २००० आणि २००५ मध्ये रस्ता रुंदीकरण करताना दोन्ही बाजूला खुणा असताना फक्त एकाच बाजूचे रुंदीकरण करण्यात आल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत संबंधित प्रशासकीय कार्यालयात हरकती नोंदवूनही शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. केवळ राजकीय हितसंबंध जपण्यासाठी बाह्यवळण रद्द करून एकाच बाजूचे रुंदीकरण केले जात आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे.