पुणे : इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी परिसरात गेल्या वर्षी डेंग्यूचा उद्रेक झाला. अचानक रुग्णसंख्या वाढल्याने डासांमुळे पसरणाऱ्या साथरोगांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या वेळी बिजवडीतील मदर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने परिसरातील गावांतील शौचालयांच्या वायुविजन नलिकेला जाळी लावण्याचा अनोखा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रकल्पाला यश येऊन परिसरात गेल्या वर्षी सप्टेंबरपासून डेंग्यू आणि हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
बिजवडीतील मदर प्राथमिक आरोग्य केंद्र हे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील महत्त्वाचे आरोग्य सेवा केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या परिसरात गेल्या वर्षी डेंग्यूचा उद्रेक झाला. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना सुरू झाल्या. त्या वेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली. डास प्रामुख्याने शौचालयावरील वायुविजन नलिकेमध्ये मोठ्या संख्येने असतात, अशी माहिती काही तज्ज्ञांनी त्यांना दिली. त्यावर या शौचालयाच्या वायुविजन नलिकेला जाळी लावल्यास डासांची संख्या कमी होऊ शकते, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांतील एक हजार घरांच्या शौचालयांवरील वायुविजन नलिकेला जाळी लावण्यात आली. शौचालयाच्या पाठीमागे असणाऱ्या या नलिकेमधून डासांची मोठ्या संख्येने पैदास होते. ही जाळी बसविल्याने डासांचे बाहेरून आतमध्ये किंवा आतून बाहेर जाणे बंद होऊन त्यांची पैदास कमी झाली. त्यामुळे या परिसरातील डेंग्यू आणि हिवतापबाधित रुग्ण सापडणे बंद झाले.नंतर राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत परिसरातील १० हजार वायुविजन नलिकांना जाळी बसविण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून आतापर्यंत बिजवडी आरोग्य केंद्राच्या परिसरात एकही डेंग्यू अथवा हिवतापाचा रुग्ण आढळून आलेला नाही.
सामाजिक संस्थांसह विद्यार्थ्यांची मदत
आरोग्य केंद्राच्या परिसरातील गावांतील १० हजार घरांतील शौचालयांवरील वायुविजन नलिकांना जाळी बसविण्यासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च आला. यात सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केली. आशा सेविकांनी या जाळ्या शिवून दिल्या. आरोग्य कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी जाळ्या बसविण्यास मदत केल्याने त्यासाठीचा खर्च कमी होण्यास मदत झाली.
आरोग्यमंत्र्यांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकार कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्यासाठी हा अगदी कमी खर्चिक पर्याय आहे. आरोग्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्याची सूचनाही केली आहे.- डॉ. सुश्रुत शहा, वैद्यकीय अधिकारी, मदर प्राथमिक आरोग्य केंद्र, बिजवडी