राज्यात विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोडय़ा आणि टीकाटिप्पणींचा समाचार घेत त्यास उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेणार आहेत. तर त्यांच्या सभेला भाजपाकडून देखील उत्तर दिलं जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर म्हणजे १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे, या सभेतून आम्ही उत्तर देऊ असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हुंकार सभेनंतर १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्या हुंकाराला काय उत्तर द्यायचं ते देऊ. असं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरून राजकीय वातावरण तापवलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचे आरोपसत्र सुरूच असून भाजपासमर्थक खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी देखील मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देत मोठा गोंधळ निर्माण केला होता.

तर, आज शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांच्या तपासण्याचे व्हिडीओ आणि फोटोंवरून रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शिवसेना आता आपण सरकारमध्ये आहोत, हे विसरून पुन्हा एकदा मूळ शिवसेनेच्या मूडमध्ये आलेली आहे. लोक याची दखल घेतील.”

याचबरोबर, “या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास देण्याचा आणि हम करे सो कायद्याचा प्रयत्न सुरू आहे.” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.